मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली असून सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर विशाल बंडगार याने बुधवारी त्याला धमक्या दिल्या जात असल्याचा खुलासा केला आहे. ड्रायव्हरने बोलताना सांगितलं की, त्याला एकाच दिवसात अनेक फोन येत असून शिव्या आणि धमक्या देण्यात येत आहेत. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आता मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस वेगवेगळे कांगोवे तपासून पाहत आहेत.


विशाल बंडगार यांनी सांगितलं की, 'माझा भाऊ आणि मी शहरात अनेक रुग्णालयांसाठी अॅम्ब्युलन्स सेवा पुरवतो. परंतु, याआधी कधीच असं झालं नाही. परंतु, जेव्हापासून आम्ही सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. तेव्हापासून लोक आम्हाला धमक्या देत आहेत.' विशालने बोलताना सांगितलं की, 'फोन करणारी व्यक्ती नेहमीच आक्षेपार्ह्य भाषेत बोलत असते आणि अॅम्ब्युलन्समधून घेऊन जाताना सुशांत जिवंत असल्याचं सांगतात.'


सुशांतच्या हत्येचा आरोपही माझ्यावर लावतात : अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर विशाल बंडगार


विशालने बोलताना सांगितले की, 'त्याच्यावर सुशांतची हत्या केली असल्याचा आरोपही लावण्यात येत आहे. फोन करणारी व्यक्ती आम्ही गळा दाबून सुशांतची हत्या मी केली आहे आणि देव याची मला शिक्षा नक्की देईल, असंही सांगण्यात येतं. विशाल बंडगार आणि त्याच्या भावाने एकूण चार अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या असून त्यावर संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर देशभरातून फोन येत असून त्यांना धमक्या देण्यात येत आहेत.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत होणार आहे. बिहार सरकारने मंगळवारी (4 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यानंतर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा ही बिहार सरकारची शिफारस मान्य करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :