मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या बिहार पोलीस करत आहेत. तीन पातळ्यांवर सुशांतच्या मृत्यूची चौकशी होते आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो मानसिक तणावात होता का? दुसरी गोष्ट, त्याला बॉलिवूडच्या बड्या बॅनर्सपैकी कुणी त्रास देत होतं का? तिसरी, बिहार पोलिसांमध्ये तक्रार झाल्यानुसार रिया चक्रवर्ती जी सुशांतची मैत्रीण होती, तिने त्याला फसवलं का? यावर आता खल होतो आहे. शिवाय याला राजकीय पदरही आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितल्यानुसार सुशांतच्या कुटुंबियांनी जर सीबीआय चौकशीची मागणी केली तर हे प्रकरण सीबीआयकडे जाऊ शकतं असं सांगितलं आह. हे सुरू असताना बिहार पोलीस आपला तपास करत आहेतच. त्यात काही गोष्टी आढळल्या त्या अशा...


उद्धव ठाकरेंना कायदा कळत नाही
राजपूत कुटुंबियांनी बिहार पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विकस सिंह या वकिलांनी कृष्णसिंह राजपूत यांचं वकिलपत्र घेतलं आहे. एका मुलाखतीत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. सुशांत मृत्यूप्रकरणी ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते आमच्याकडे घेऊन यावेत. आम्ही दोषींवर नक्की कारवाई करू असं सांगितलं होतं. त्यावर बोलताना राजपूत यांचे वकिल विकास सिंह म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कायदा कळत नाही. आता बिहार पोलिस महाराष्ट्रात जाऊन तपास करत आहेत. ते जे पुरावे आणतील तेच आमच्यासाठी महत्वाचे असतील. उद्धव काय म्हणतात ते आता महत्वाचं नाही. कारण, बिहार पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.


मोबाईल सिमकार्ड सुशांतच्या नावावर नाहीच
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेता शेखर सुमन कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी बिहारमध्ये जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी संदीप सिंग हा सुशांतचा मित्रही सोबत होता. आपल्याला आठवत असेल तर सुशांतच्या मृत्यूनंतरचे सगळे सोपस्कार संदीपने पुढे होऊन केले. त्यावेळी सुशांतने एका महिन्यात 50 सीमकार्ड बदलल्याचा दावा शेखर सुमन यांनी केला होता. त्यांनी तशी रीतसर पत्रकार परिषदही घेतली होती. पण बिहार पोलिसांच्या मते सुशांत जी सिम्स वापरत होता ती त्याच्या नवावार नव्हती. सिद्धार्थ पिठानी याच्या नावावरचं एक सिमकार्ड सुशांत वापरत होता. बिहार पोलिस त्या फोनचं ट्रॅक रेकॉर्ड काढत आहेत. त्याचवेळी सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सॅलियनच्या कुटुंबियांची चौकशीही हे पोलिस करणार आहेत. दिशाच्या आत्महत्येनंतर सुशांत तणावात असल्याचं बोललं जातं.


त्या दिवशी सुशांत तणावात होता - आचारी
14 जूनच्या दिवशी सुशांतसोबत त्याचे दोन आचारी होते. सकाळ झाल्यावर सुशांत आपल्या रुममधून बाहेर आला आणि त्याने चील्ड वॉटर अर्थात अतिथंड पाणी मागितल्याचं त्याचा आचारी नीरज सिंग सागतात. 'त्या दिवशी सकाळी मी सुशांतच्या घरीच होतो. सकाळी उठून सुशांत त्याच्या रूममधून बाहेर आला. त्याने थंड पाणी मागितलं. मी त्याला ते दिलं. तो खूपच तणावात होता. त्यानंतर केशवने (दुसरा आचारी) त्याला आज दुपारी काय जेवणार म्हणून विचारलं. पण त्यावर तो काहीच बोलला नाही.' सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याचे दोन्ही कुक घरीच होते. सुशांत त्या दिवशी तणावात होता हे यांच्या स्टेटमेंटमधून समोर येतं.


सुशांत बायोपोलर होता?
सुशांतसिंह राजपूत मानसिक तणावातून जात होता. त्याला बायोपोलर डिसॉर्डर होती असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या मनोविकार तज्ज्ञ सुझॅन वॉकर म्हणतात. त्यांनी पाठवलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये सुशांतला हा आजार असल्याचं म्हटलं आहे. मात्र सुशांतचे भावोजी विशाल किर्ती यांनी मात्र सुशांतला हा आजार असल्याचा इन्कार केला आहे. हा आजार कळायला बराच काळ जावा लागतो. मात्र सुझॅन यांनी दोन महिन्यांतच त्याचं निदान करून टाकलं. या त्यांच्या स्टेटमेंटने मी निराश झालो आहे असं विशाल म्हणतात. सुझॅन यांच्या या वक्तव्याने सुशांतच्या मानसिकतेबद्दल शंका निर्माण होते हे खरं.


संबंधित बातम्या




रिया चक्रवर्तीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप