कंगना रनौतला दिलासा; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर
कंगना रनौतला अंधेरी कोर्टानं दिलासा दिला असून जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी उद्यापासून अंधेरी कोर्टात नियमित सुनावणी सुरु होणार आहे.

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगान रनौतला जामीन मंजूर केला आहे. कंगानं गुरुवारी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे.
याप्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायाधीश आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितले होतं. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला वॉरंट जारी केला होता.
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला होता अब्रुनुकसानीचा दावा
गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिट्स मिळाल्या होत्या. मात्र, "या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली होती.
काय आहे प्रकरण?
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतनं जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी आपला आवाज खूप जास्त चढवला होता, इतका की आपला थरकाप उडाला असा दावा कंगनानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कंगनाची बहिणी रंगोली हिनंही या घटनेची पुष्टी करत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होतेय, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Kangana Ranaut : कंगना रनौत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!
कंगना रनौतवर लेखकाने केला वाङमय चोरीचा आरोप; फसवणूक आणि कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल























