Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, असा निर्धार लोकसभा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे.

Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule Serial: सध्या स्टार प्रवाहवरची (Star Pravah) 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. येत्या काही दिवसांतच मालिका बंद होणार आहे. अगदीच महत्वाच्या टप्प्यावर वाहिनीनं TRP चं कारण देत चर्चेत असणारी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. सुरू होऊन अवघे पाच महिने झाल्यानंतर, अवघ्या 152 भागांमध्ये मालिका गुंडाळण्यात आल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. वाहिनीनं घेतलेल्या निर्णयामुळे मालिकेत काम करणाऱ्या सगळ्यांमध्येच नाराजीचं वातावरण आहे. तर, मालिका बंद होत असल्यामुळे अनेक प्रेक्षकांनीही नाराजीचा सूर आवळला आहे. मालिकेत प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अमोल कोल्हे (Actor Amol Kolhe) यांची मालिका वाचवण्यासाठी खूप धडपड सुरूये, तसेच, मालिका पुन्हा सुरू होणार असा निर्धार त्यांनी केलाय. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, असा निर्धार लोकसभा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे. तसं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना ठामपणे सांगितलं आहे.
अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले की, "जेन झींविषयी सगळे बोलतात... त्यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणांचा वैचारिक पिंड तसा पोसला गेलाय का? या तरुणाईची वैचारिक बैठक तशी तयार केली गेलीय का? आणि जर ही तयार झाली नसेल, जर ती अर्धी कच्ची मुशी असेल, तर तिला घडवण्याची, त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी कुणाची? एवढंच चिंतन करणं गरजेचं आहे... "
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत काय म्हणाले अमोल कोल्हे? (Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule )
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, "मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका 14 जूनला बंद होतेय, 14 जून शेवटचा एपिसोड मालिका बंद होतेय, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं, हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे, याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. खरतर अजिबातच मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला एका शब्दानं कधी मला विचारलं नाही की, तू मालिकेत काय दाखवतोयस? आणि काय दाखव हेसुद्धा कधीच सांगितलं नाही... हे अगदी प्रामाणिकपणे व्यक्त करतो..."
14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार : अमोल कोल्हे
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, "खंत मात्र एका गोष्टीची व्यक्त करतो की, 2017 मध्ये राजकारणात आलो नव्हतो, त्यावेळी चुकीनं केलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेसाठी बाह्या सरसावून रोखणारे हात, ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो, म्हणून शाबासकी द्यायला पुढे येताना दिसले नाहीत... याची खंत मात्र मनात कायम राहील... पण त्याचवेळी हीसुद्धा गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की, मी सुरुवातीला म्हणालो की, महाराष्ट्र धर्म लढायचं सांगतो, रडायचं नाही... 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात... मला आता माहीत नाही, कोणत्या माध्यमात, कोणत्या वाहिनीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर... पण त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार...कारण ही बांधिलकी आहे... मला माध्यमा माहीत नाही, पैसा कसा उभा राहणार मला काहीच माहीत नाही... मला फक्त एवढंच माहितीय, जर हा देश वाचवायचा असेल, तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय...आणि हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर त्याची वैचारिक बैठक मजबूत करण्याचं काम मला पुन्हा एकदा करावं लागेल, त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, या माध्यमातून उचलला जात असेल, तर माझी तयारी आहे...", असं अमोल कोल्हे म्हणालेत.
"ज्या विचारांची पताका घेऊन आपण चालायला शिकवलंय, कारण आम्ही महात्मा फुले पाहिले नाहीत, आम्ही बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत... आम्ही राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत... पण त्यांच्या विचारांनी गेली कित्येक दशकं वाटचाल करत असलेला एक माणूस आम्ही पाहिलाय, त्या माणसाचं नाव म्हणजे, आदरणीय शरदचंद्र पवार...", असं अमोल कोल्हे म्हणालेत.
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले...' मालिका का बंद होतेय?
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यात ऑफ एअर झाल्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी नव्या आठ मालिका आणणार आहे. त्यामुळे अवघ्या 152 भागांमध्येच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असणारी ' मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ' मालिका गुंडाळण्यात आली. 14 जूनला ही मालिका बंद होईल.
पाहा व्हिडीओ : Amol Kolhe Speech NCP : जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्र धर्माची पताका फडकवणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















