'रंग कुणाच्या बापाचा नाही ..' MIM च्या नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा करू ' वक्तव्यावर सयाजी शिंदेंचं सणसणीत उत्तर
महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगरसेविका सहर शेखने एक वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्यावर आता अभिनेते सयाजी शिंदेंनी सडकून टीका केली आहे.

Sayaji Shinde On Mumbra statement: राज्यात नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. 16 जानेवारी रोजी निवडणुकांचा निकाल लागला. मुंब्रा येथे AIMIM पक्षाच्या सहर शेख (Sahar Sheikh) या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. जिंकून आल्यानंतर एका भाषणात 'कैसा हराया' असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. त्याचबरोबर पुढच्या पाच वर्षात संपूर्ण 'मुंब्रा हिरवा करू ' असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यावर आता अभिनेते सयाजी शिंदेंनी सडकून टीका केली आहे. (Sayaji Shinde)' कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही' असं म्हणत त्यांनी नगरसेविकेला चांगलंच सुनावलं आहे.
महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगरसेविका सहर शेखने एक वादग्रस्त विधान केलं. यात त्या म्हणाल्या ' हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू. मुंब्रातून विरोधकांना पळवून लावू. इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल. " असं त्या म्हणाल्या होत्या. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वात ही खळबळ उडाली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे काय म्हणाले ?
एमआयएमच्या नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा करू ' या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही नाईन ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदें म्हणाले ' कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही. सगळे रंग निसर्गाच्या बापाचे आहेत .निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यामध्ये सगळे रंग आहेत . कोणाला आव आणून असं करता येत नाही.हे रंग आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात ' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे
दरम्यान मुंब्रा हिरवा करू या वक्तव्याने वाद उसळल्यानंतर MIM नगरसेविका सहर शेख यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका असं म्हणत बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या" आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असला असता तर त्या रंगाचा म्हणाले असते. माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका" याच पत्रकार परिषदेत MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी 'मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू' असं वक्तव्य केल्याने या वादाला आणखी हवा मिळाली.
























