राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, सामनातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर वार
राजा मस्त आणि प्रजा त्रस्त , शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती, असे म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

Eknath shinde vs uddhav thackeray : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून 'मायबाप' सरकार राज्यातून पसार झाले आहे. अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत . राजा मस्त आणि प्रजा त्रस्त , शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती, असे म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि सरकारवर जहरी टीका केली आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना सत्ताधारी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार?
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून 'मायबाप' सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी 'सरकार' असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे, पण महाराष्ट्रात चित्र उलटेच दिसत आहे. पावसाळय़ातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके व फळबागांची भयंकर हानी झाली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार? असा सवाल अग्रलेखात केलाय.
राजा मस्त आणि प्रजा त्रस्त
राज्यातील तमाम शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे? महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा 'पालक' असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले 'मालक' असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत. पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे? तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. 'रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवत होता' अशी एक ऐतिहासिक म्हण आहे. फरक इतकाच की, कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती, असे अग्रलेखात म्हटलेय.




















