Raj Thackeray : मुलाने म्हणू नये आई-बाप 1500 रुपयासाठी विकले गेले, जाती-धर्माच्या प्रचाराला भुलू नका; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Raj Thackeray Nashik Speech : 1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये एकही उमेदवार मिळत नाही, दुसऱ्याची पोरं भाड्याने घ्यावी लागतात असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

नाशिक : शहर दत्तक घेतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी नाशिकचा किती विकास केला? भाजपने फक्त जाती धर्माच्या नावे लोकांना भुलवलं आणि सत्ता मिळवली. तपोवनाती झाडे छाटायच्या आधी यांनी त्यांच्या पक्षातील निष्ठावंतांना छाटलं अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली. भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असं म्हणू नये अशी जर इच्छा असेल तर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांना निवडून द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा ही नाशिकमध्ये झाली.
Raj Thackeray Nashik Speech : राज ठाकरेंच्या भाषणाचे मुद्दे
महाराष्ट्रात साठ-सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात?
1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची.
झाडांच्या आधी पक्षातील लोक छाटले
लाकुडतोड्या बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. पण यांनी तपोवनातील झाडं छाटायच्या आधी पक्षातील लोकं, कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणली जातात.
नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामं विसरले. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत.
2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचं नियोजन उत्तम करण्यात आलं. त्यासाठी एकही झाड कापलं नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झालं? भाजपचं आगोदरच ठरतं. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडं तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचं हे सगळं आधीच ठरलेलं असतं.
नाशिकला मनसेने कर्जमुक्त केलं होतं
नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केलं होतं. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटी कर्ज होतं. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही.
मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असं सांगितलं होतं. हे होऊ शकतं, पण यांना आता करायचं नाही.
देवेंद्र फडणवीसांच्या नुसत्या घोषणा
नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केलं. पण एकही काम त्यांनी केलं नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवलं. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला. एवढं काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केलं नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे.
आमचा आई-बाप 1500 रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असं जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असं वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभा राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचं असेल तर तुम्ही सज्ज व्हा.




















