Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
प्रभाग क्रमांक 12 'ब' मध्ये महायुतीच्या दोघा उमेदवारांनी अर्ज केल्याने घोळ केल्याने प्रभाग 12 क मध्ये महायुतीचा उमेदवारच राहिलेला नाही. त्यामुळे अपक्षाला पुरस्कृत करावा लागणार आहे.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पहिला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 12 क मध्ये अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ महायुतीवर येणार आहे. या प्रभागात महायुतीचा उमेदवारच शिल्लक राहिलेला नाही. प्रभाग क्रमांक 12 'ब' मध्ये महायुतीच्या दोघा उमेदवारांनी अर्ज केल्याने घोळ केल्याने प्रभाग 12 क मध्ये महायुतीचा उमेदवारच राहिलेला नाही. त्यामुळे अपक्षाला पुरस्कृत करावा लागणार आहे. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. भाजप 36 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला 15 जागा देण्यात आले आहेत.
इंद्रजित उर्फ जितू सलगर यांची माघार
माजी नगरसेवक इंद्रजित उर्फ जितू सलगर यांनी प्रभाग क्र. 12 मधून उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी नगरसेवक जितू सलगर यांचे आभार मानेल. भविष्यात महायुतीकडून योग्य तो सन्मान केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
भाजप सरचिटणीस धनश्री तोडकर यांची माघार
दरम्यान, आर्थिक परिस्थिती नसल्याने भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नसल्याचे सांगत भाजप सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी थेट भाजप कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांना यश आलं आहे. आज (2 जानेवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी धनश्री तोडकर यांनी आपला अर्ज माघार घेतला. निवडणुकीनंतर पक्षात मोठी जबाबदारी देण्याचा धनश्री तोडकर यांना वरिष्ठांकडून शब्द देण्यात आला आहे.
आर्थिक परिस्थिती नाही म्हणत तिकिट नाकारल्याचा आरोप
धनश्री तोडकर यांनी म्हटलं होतं की, मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. काही महिन्यापूर्वी माझे पती सचिन तोडकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम मी एकटी महिला असून घेतले, पण आज माझी आर्थिक परिस्थिती नाही. या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने आत्मदहन करणार असल्याचे म्हटले होते.




















