Lok Sabha Election MVA & Mahyuti Rally LIVE: महायुती Vs महाविकास आघाडी, हायव्होल्टेज सभा, बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Politics: राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार. बड्या नेत्यांच्या राज्यातील शेवटच्या सभा. मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीचा हायव्होल्टेज सामना.

Background
मुंबई: राज्यात येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. आतापर्यंतच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी (MVA Rally) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) प्रचंड चुरस पाहायला मिळाली. चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक द्वंद्व रंगले होते. त्यानंतर आता मुंबईत या लढाईचा शेवटचा सामान रंगणार आहे. (Lok Sabha Election 2024)
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, शरद पवार, संजय राऊत या बड्या नेत्यांची भाषणे होती. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची भाषणे आकर्षणाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या मोदींकडून 5 मागण्या, भरसभेत व्यक्त केल्या अपेक्षा
पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
उबाठा ला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही. काँग्रेसमध्ये उबाठा लोळतायेत. बिघडणारं पोरगं चुकीच्या वाटेला लागलेलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती आहे.



















