Nashik Crime News: नाशिकचं बिहार होतंय का? नऊ महिन्यांत 45 खुनाच्या घटना, अवघ्या पाच तासात दोघांचा खात्मा; वर्दीचा धाक संपला
Nashik Crime News: नाशिकसारख्या शांत समजल्या जाणाऱ्या शहरात आता गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नऊ महिन्यांत तब्बल 45 खुनांच्या घटना घडल्या आहेत.

Nashik Crime News: नाशिकसारख्या (Nashik) शांत समजल्या जाणाऱ्या शहरात आता गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नऊ महिन्यांत तब्बल 45 खुनांच्या घटना, तर फक्त एका दिवसात अवघ्या पाच तासांत दोन खून, अशा घटनांनी नाशिककरांना हादरवून सोडलं आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहता नाशिकचं बिहार (Bihar) होतंय का? पोलिसांच्या वर्दीचा धाक संपला आहे का? असे सवाल सर्व सामान्य नाशिककरांमधून उपस्थित होत आहेत.
Nashik Crime News: नाशिक रोडवर प्रॉपर्टी वादातून हत्या
पहिली घटना नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात घडली. पहाटे गुरुद्वारात जाणाऱ्या अमोल मेश्राम याच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
Nashik Crime News: आईचाच खून, सातपूरमधील धक्कादायक प्रकार
या घटनेनंतर अवघ्या काही तासांत दुसरी घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. जिथं मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून केला. 45 वर्षीय मंगला घोलप, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होत्या. त्यांचा मुलगा स्वप्नील घोलप याने धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केला. घटनेनंतर पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतले असून, सातपूर पोलीस ठाणे या घटनेचा तपास करत आहे.
Nashik Crime News: नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून, मारामाऱ्या, तोडफोड, हाणामाऱ्या, विनाकारण वाद वाढले आहेत. दिवसाढवळ्या होणारे हल्ले, रस्त्यावर लोकांना घेरून होणारे खून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारांना वर्दीचा धाक उरलेला नाही, असं चित्र तयार झालं आहे. पोलिसांकडून वेळेवर कारवाई होत असली तरी गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे.
Nashik Crime News: शहराच्या प्रतिमेला धक्का
एकेकाळी शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आदर्श समजलं जाणारं नाशिक शहर, आता गुन्हेगारीमुळे चर्चेत येत आहे. मुंबई, ठाणे किंवा पुण्याच्या तुलनेत नाशिक अधिक सुरक्षित मानलं जात होतं, मात्र आता ही प्रतिमा भरभरून बदलत चालली आहे. नाशिकमधील गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे. नाशिक पोलीस गुन्हेगारीवर कशा प्रकारे अंकुश लावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा


















