खूप वेळ घरी परतले नाहीत, शोध घेतला तेंव्हा दिसला लटकलेल्या अवस्थेत, संभाजीनगरात अल्पभूधारक शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल
सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Chhatrapati Sambhajinagar Crime: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठा नुकसान झाला आहे. आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या उघडकीस येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. आत्महत्या निराशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
नेमकी घटना काय?
सुरेश मुळे हे वरुड काजी येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात आई आणि दोन मुले आहेत. त्यांना दोन एकर शेती असून, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी सुरेश बराच वेळ घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु सुरेश मुळे सापडले नाहीत. काही वेळानंतर गावकऱ्यांना माहिती मिळाली की सुरेश मुळे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. घटना उघडकीस आल्यावर गावात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आर्थिक ताण आणि मानसिक नैराश्यामुळे ही आत्महत्या झाल्याचे दिसते, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त
महाराष्ट्रच्या मराठवाडा व कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यांना झोडपून काढत आहे. सोलापूर, बीड, हिंगोली आणि लातूरमध्ये शेतकरी, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. नदीकाठच्या गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, पूल उध्वस्त झाले आणि विद्युत पोल आडवे झाले. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. बीडमध्ये जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरलंय.
























