खरातला पोटाचे विकार, दोन वेळा उपचार; डॉक्टरशी ओळख केली अन् शिवनिका संस्थेच्या विश्वस्तपदासाठी घातली गळ; भोंदूबाबा प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा एसआयटीकडून वाचला जात असतानाच, आता त्याच्या 'शिवनिका' संस्थेतील विश्वस्तांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापकर्मांचा पाढा एसआयटी (SIT) कडून वाचला जात असतानाच, आता त्याच्या 'शिवनिका' संस्थेतील विश्वस्तांबाबत नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरातला असलेल्या पोटाच्या विकाराचा फायदा घेत त्याने एका नामांकित डॉक्टरांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना संस्थेचे विश्वस्त केल्याचे उघड झाले आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातवर दोन वेळा पोटाच्या व्याधीवर उपचार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याला गेल्या काही काळापासून पोटाचा गंभीर विकार होता. या व्याधीवर उपचार करण्यासाठी तो डॉ. नंदकिशोर कातोरे यांच्याकडे गेला होता. डॉ. कातोरे यांनी खरातवर दोनवेळा पोटाच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले. सुरुवातीला हे नाते केवळ डॉक्टर आणि रुग्ण इतकेच मर्यादित होते. मात्र, उपचार यशस्वी झाल्यानंतर खरातने या ओळखीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.
Ashok Kharat Nashik Crime News: गळ घातली अन् विश्वस्त केले!
ऑपरेशननंतर खरातने डॉ. कातोरे यांच्याशी जवळीक वाढवली. आपल्या तथाकथित आध्यात्मिक कार्याचा प्रभाव टाकत त्याने डॉक्टरांना आपल्या 'शिवनिका' संस्थेचे विश्वस्त होण्यासाठी वारंवार गळ घातली. खरातच्या आग्रहाखातर अखेर डॉ. कातोरे यांचा विश्वस्त म्हणून समावेश करण्यात आला.
Ashok Kharat Nashik Crime News: डॉ. कातोरे यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर डॉ. नंदकिशोर कातोरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "खरातशी माझे केवळ डॉक्टर आणि रुग्ण म्हणूनच संबंध होते. उपचारांनंतर वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने मला संस्थेत येण्यासाठी आग्रह केला. मात्र, माझा त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी संबंध नाही."
Ashok Kharat Nashik Crime News: SIT च्या तपासाकडे सर्वांचे लक्ष
खरातने आपल्या संस्थेमध्ये अशाच प्रकारे किती प्रतिष्ठित व्यक्तींना 'गळ' घालून विश्वस्त म्हणून सामावून घेतले आहे, याचा तपास आता एसआयटी करत आहे. संस्थेच्या नावाखाली नेमके कोणते आर्थिक व्यवहार झाले आणि त्यात विश्वस्तांची भूमिका काय होती, हे आता पोलीस चौकशीत स्पष्ट होईल. भोंदूगिरीच्या या जाळ्यात केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षित वर्गही कसा ओढला गेला, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
आणखी वाचा





















