बारामती : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग मनात धरुन पोलीस शिपाई आणि त्याच्या मित्रांवर 23 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. दौंड तालुक्यातील पाटस इथे दौंड काष्टी रोडवर सोमवारी (18 एप्रिल) संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी विजय क्षत्रीय, जॉकी पानसरे , बिट्टू पानसरे  यांच्यासह इतर 20 जणांवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दौंड काष्टी रोडवरील भीमा नदीच्या पुलावर दोन व्यक्ती एका वाहनचालकाला मारहाण करत होते. या दरम्यान हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई दत्तात्रय शिंदे, नितीन जमदाडे आणि त्यांचे काही मित्र पुण्याला जात असताना त्यांना हा प्रकार दिसला. यावेळी त्यांनी मध्यस्थी करत वाहनचालकाला का मारता, त्याला मारु नका असं सांगत दोघांची समजूत काढून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या दोघांनी त्यांच्यावर अरेरावी करत बघून घेतो अशी धमकी देत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. 


पाटसजवळ पाटबंधारे विभागाच्या जुन्या कार्यालयासमोर या दोघांनी गाडी आडवी करुन दत्तात्रय शिंदे यांची गाडी अडवली. त्यावेळी त्याठिकाणी 21 जणांचे टोळकं अगोदरच उभं होतं. त्यांनी शिवीगाळ दमदाटी करुन हाताने, लाथाबुक्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांच्या कारवर दगड फेकून तोडफोड केली. बिट्टू पानसरेने हातात मोठा दगड घेऊन नितीन जमदाडे यांच्यावर धावून गेला. त्याने तो दगड मारला परंतु शिंदे यांनी बिट्टू पानसरेला लाथ मारल्याने नितीन जमदाडे हा या हल्ल्यातून बचावला.


यानंतर दत्तात्रय शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने 23 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस आहेत.


संबंधित बातम्या