एक्स्प्लोर

BLOG : सत्यपाल महाराज : परिवर्तनवादी विचारपीठाचा 'प्रबोधनकार'

Satyapal Maharaj Maharashtra : सत्यपाल महाराज... उभ्या आणि आडव्या महाराष्ट्रात हे नाव न ऐकलेला माणूस विरळाच... सत्यपाल महाराज गेल्या साडेचार दशकांपासून आपल्या सात खंजेऱ्यांतून महाराष्ट्राची वैचारीक 'मशागत' करीत आहेत. महाराष्ट्राभर छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या विचारांची पेरणी करीत सत्यपाल महाराजांनी हे सर्व महापुरूष महाराष्ट्राला नव्यानं सांगितले आहेत. या सर्व महापुरूषांचा वैचारीक, कृतीशील 'वारसदार'  म्हणजे सत्यपाल महाराज... आज याच वैचारिक वारसदाराचा 'वाढदिवस'. महाराष्ट्राचं हे विचारांचं 'वादळ' आज 67 वर्षांचं झालं आहे.
 
सत्यपाल महाराज म्हणजे विचार, आदर्शवाद प्रत्यक्षात जपणारा 'महाराज'. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व वैचारिक कार्यकर्त्यांसमोर 'आधी केले, मग सांगितले' असा 'कृतीशील आदर्शवाद' सत्यपाल महाराज घालून देतात. त्यामूळे अलिकडे 'महाराज' या शब्दावर काहीसं अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं असतांना सत्यपाल महाराज 'अस्सल' आणि 'बावन्नकशी' महाराज वाटतात. त्यांच्यातील वैचारिक कार्यकर्त्याचा पाया मजबूत करण्याचं मोठं काम त्यांची आई 'सुशीला' यांनी केलं. हिच 'माय सुशिला' 21 फेब्रुवारी 2020 ला जगाचा निरोप घेत अनंताच्या प्रवासाला निघून गेली. याही परिस्थितीत सत्यपाल महाराजांनी एक 'आदर्श' जगासमोर ठेवला. असा आदर्श प्रत्यक्ष समाजासमोर ठेवणं जगातील कोणत्याही संवेदनशील, मातृभक्त पोरासाठी कठीण असाच. मात्र, सत्यपाल महाराजांनी तो आपल्या कृतीतून सहज समाजासमोर ठेवला आहे.
 
21 फेब्रूवारी 2020 ... रात्री सातच्या सुमारासची वेळ... वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावातील कीर्तनाचा मंडप नागरिकांच्या गर्दीनं अगदी फुलुन गेलेला. सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांच्या खंजेरीतून आज कोणता सामाजिक जागर होणार?, याची उत्सुकता कीर्तनासाठी आलेल्या आबालवृद्धांना होती. महाराजही किर्तनासाठी व्यासपीठावर जाण्यासाठी सज्ज होते. तितक्यात सत्यपाल महाराजांचा फोन वाजला. पलीकडून सांगण्यात आलं, 'आई गेली'...
 
फोन ठेवताच सत्यपाल महाराजांनी गच्च डोळे मिटलेत. आईच्या आठवणींनी त्यांचा बांध फुटला. आपल्या कीर्तनातून समाजाला हसवणारे, अंतर्मूख करणारे सत्यपाल महाराज यावेळी मात्र धाय मोकलून रडत होते. कारण, त्यांच्या आयुष्याला वळण आणि संस्काराची सावली देणारा 'आई' नावाचा वटवृक्ष उन्मळून पडला होता. एकीकडे किर्तनासाठी जमलेली अफाट गर्दी आणि दुसरीकडे आई गेल्याचं आभाळभर दु:ख. अनेकांनी महाराजांना कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला. ही सत्यपाल महाराजांची कसोटी पाहणारा क्षण होता. महाराजांसोबतचे सर्वच नि:शब्द होते. त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली होती.
 
मात्र, त्याचक्षणी सत्यपाल महाराजांनी स्वत:ला सावरलं. "मी कीर्तन रद्द करणार नाही. मी कीर्तन करूनच अकोटला जाणार. आईला किर्तनातूनच श्रद्धांजली देणार. आईनंच मला समाजसेवेचे संस्कार आणि वारसा दिला". सत्यपाल महाराजांच्या या वैचारिक निग्रहाचं उपस्थितांना मोठं नवल वाटलं अन अभिमानही वाटला. सत्यपाल महाराजांवर बालपणापासून आई सुशीलानं संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार बिंबवलेत. आई सुशीलानं तरूणपणात अनेकदा गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची किर्तनं ऐकलीत. तेच विचार तिनं सत्यपालमध्ये पेरलेत. 
 
गाडगेबाबांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आज सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही आला होता. एका किर्तनाच्यावेळी गाडगेबाबांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती त्यांना कळली. मात्र, त्यांनी मुलाच्या मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवत किर्तनाला सुरूवात केली. त्यांनी किर्तनाची सुरूवातच "असे मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी", असं म्हणत समाजप्रबोधनाचा जागर केला.
 
सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही त्यांच्या वैचारिक दैवताच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग दुर्दैवानं आला होता. तरोड्यात लोकांनी खच्चून भरलेलं मैदान सत्यपालच्या सात खंजेऱ्यांनी निनादून गेलं. "माय-बापहो!, म्हातारपणात माय-बापाची आबाळ नका होऊ देऊ. त्यायच्या मुळंच तुमचा जगात मान हाय. चारी धामाचं सुख माय-बापाच्या सेवेत हाय. बापहो!, कोणत्याही माय-बापाले वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नका". किर्तनात अनेकदा सत्यपाल महाराजांचा हुंदका अनेकदा दाटून आला. किर्तनाच्या शेवटी सत्यपाल महाराजांनी आपल्या स्वर्गीय आईला अभिवादन केलं. 
 
पुढे आणखी मोठी कसोटी होती. सत्यपाल महाराजांच्या आईचं देहदान करायचा निर्णय झालेला होता. सहा तासांच्या आत देहदान करणं वैद्यकीय कारणांनी आवश्यक होतं. अन् तेव्हढ्या वेळात सत्यपाल महाराजांना अकोटला पोहोचणं शक्य नव्हतं. अखेर महाराजांच्या अनुपस्थितीतच आईचं अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आलं. सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातलं 'सुशीला' नावाचं सतत धगधगतं असणारं अग्नीकुंड वयाच्या 93 व्या वर्षी शांत झालं होतं. ज्या आईच्या ममतेच्या पदराखाली आयुष्याची 65 वर्ष काढलीत, त्याच आईचं अंत्यदर्शन महाराजांना घेता आलं नाही. मात्र, 'आई' नावाच्या विद्यापीठाच्या आदर्श संस्कारांनी सत्यपाल महाराजांना एव्हढ्या कसोटीच्या प्रसंगात आपला आदर्शवाद प्रत्यक्षात उतरविण्याची ताकद दिली.
 
सत्यपाल महाराजांचं पूर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातलं सिरसोली हे त्यांचं गाव. घरी अठराविश्व दारिद्र्य असतांना विश्वनाथ आणि आई सुशीलानं विचारांची मोठी श्रीमंती या दांपत्यानं आपल्या लेकरांना दिली. खंजेरी घेण्याची ऐपत नसलेल्या सुशीलाबाईनं फुटलेल्या मडक्यावर कागदं चिकटवत छोट्या सत्यपालला खंजेरी बनवून दिली. पुढे याच सत्यपालनं विचार, संस्कारांच्या विचारांचा 'गजर' आणि 'जागर' आपल्या सात खंजिऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात केला. आपल्या किर्तनातील 'सत्यवाणी'तून सत्यपाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, दारूबंदी, अनिष्ट रूढींवर कठोर प्रहार केलेत. 
 
कधीकाळी फक्त दैववादाची पेरणी करणाऱ्या किर्तनाला त्यांनी सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची पेरणी करणारं माध्यम बनवलं. ते विचार स्वत:ही आचरणात आणलेत. त्यामूळेच किर्तन क्षेत्रातील 'सिलेब्रिटी' असणारे सत्यपाल महाराज आजही स्वत:चा खर्च भागविण्यासाठी आजही कपडे विकतात. पाच वर्षांपूर्वी आपल्या पत्नीचंही देहदान सत्यपाल महाराजांनी करीत आपण कृतिशील आदर्शवादी असल्याचं समाजाला दाखवून दिलं होतं.आई जिवंत असतांनाच तिच्या नावानं 'माय सुशीला' नावानं अँबुलंस सुरू करणारा, स्वखर्चातून सिरसोली या आपल्या गावात आईच्या नावाचं प्रवेशद्वार उभारणारा हा मुलगा. 
 
आदर्शवाद' सांगणं अतिशय सोपं अन् सरळ.... मात्र, तो स्वतः जगणं, पाळणं अन त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच कठीण... म्हणूनच विचारांची दिशा स्पष्ट अन् प्रांजळ असणार्‍या सत्यपाल महााजांचं वेगळेपण म्हणूनच कृतिशील आदर्शवादाची शिकवण देणार ठरलंय. महाराजांचा हा कृतिशील आदर्शवाद हा एका चांगल्या विचारांची नांदी ठरणारं आहे.
 
सरकार पातळीवर आजही सत्यपाल महाराजांचं कार्य काहीसं उपेक्षितच म्हणावं लागेल. कारण, गेली 40 वर्ष महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी त्यांचं सातत्यानं समाजप्रबोधन सुरू आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांसोबतच फुले-शाहू-आंबेडकर, राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराजांचे विचार कृतीशील आदर्शातून, किर्तनातून समाजात पेरले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या वैचारिक जडण-घडणीत सक्रीय भूमिका बजावणार्या सत्यपाल महाराजांना अद्यापही 'महाराष्ट्रभुषण' पुरस्कारानं गौरविण्याचं सरकारच्या मनात आलं नाही. केंद्र सरकारनंही 'पद्मश्री'सारख्या पुरस्कारानं त्यांचा गौरव केला असता तर महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा देशानं गौरव केल्याचा संदेश देशभरात गेला असता. परंतु, सत्यपाल महाराज कधीच कोणत्या नेत्यांच्या, पक्षाच्या कळपात शिरले नाहीत. ना त्यांनी कधी कुणाची तळी उचलली. कारण, सत्यपाल महाराजांची निष्ठा 'प्रबोधनकार' या शब्दाच्या अस्सलतेसोबत आहे. सरकारला जेव्हा सद्बुद्धी सुचेल तेंव्हा तो महाराष्ट्राच्या 'प्रबोधन' परंपरेचा सर्वार्थाने गौरव असेल. 
 
महाराज!, अलिकडचा काळ समाजासाठीचा 'संक्रमण काळ'. अलिकडच्या काळातील काही घटनांनी समाजमन पार ढवळून गेलेलं.  अशा परिस्थितीमुळं सारं आकाशच अंधारून गेलं असं वातावरण आहे. मात्र, तुमच्यासारखे या अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही दुवे समाजात आहेत. त्यामुळेच आजही समाजात सकारात्मक विचार, चांगुलपणा टिकून आहे. विचारांचा वारसा जपणारे सत्यपाल महाराज हे नाव अलिकडच्या काळातील गल्लाभरू महाराजांच्या गर्दीत आजही तेजानं अन अभिमानानं आपलं स्वत्व टिकवून आहेत. 'माय सुशीला'च्या संघर्ष, विचार आणि संस्कारांना शतश: नमन!. अन् तुमच्या कृतिशील आदर्शवादासही मानाचा मुजरा अन सलाम..... महाराज!, तुमच्या सप्तखंजेऱ्यांतून विचारांचा 'गजर' अन 'जागर' असाच निनादू द्या...

'एबीपी माझा' परिवाराकडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!...
 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget