Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री 8 मार्चला साजरी होत आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivratri) साजरी केली जाते. अनेकजण शंकराला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास करतात, तर अनेकजण महादेवाची मनोभावे पूजा करुन आपल्या इच्छा व्यक्त करतात. पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. या दिवशी उपवास आणि विधीपूर्वक पूजा केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. 


यावेळी महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्ध योग, गजकेसरी योग, धन योग आणि सर्वार्थ सिद्धी असे शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. ज्योतिष शास्त्रात महाशिवरात्रीचं महत्त्व सांगताना या शुभ योगांमध्ये करायचे काही विशेष ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने महादेवाचा विशेष आशीर्वाद लाभतो आणि जीवनातील सर्व अडचणी देखील दूर होतात. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊया.


या उपायाने घरात नांदेल सुख-समृद्धी


ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. पौराणिक कथेनुसार, कुबेर देवांनी मागच्या जन्मात रात्री शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लावला होता, म्हणून त्यांना विशेष आशीर्वाद लाभला आणि पुढल्या जन्मात ते धनाचे देव झाले. या उपायाने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील सुटतील.


या उपायाने घरात राहील लक्ष्मी


महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे. तूप दानामुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, असं म्हणतात. या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासत नाही.


पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हा उपाय


महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो, असं शास्त्रात सांगितलं आहे.


या उपायाने दूर होईल गरिबी


महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करुन 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्यास गरिबी आणि दु:ख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी-व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते.


या उपायाने सर्व संकटं टळतील


महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा. 21 बेल पानांवर 'ओम नमः शिवाय' लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख-शांति नांदेल. तसेच सर्व प्रकारची पापं नष्ट होतील आणि संकटं दूर होतील.


या उपायाने सर्व मनोकामना होतील पूर्ण


तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात एक काळी मिरी आणि सात काळे तीळ ठेवा, आता भगवान शंकराची प्रार्थना करा, त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते देखील दूर होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला प्रियजनांना 'हे' संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा; महादेवाचं करा नामस्मरण