दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आता थांबली असली तरी काही दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. अजूनही विलिनीकरण होऊ शकते असे राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अपेक्षा नेहमीच कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कुणीही स्पष्टपणे बोलत नाही, विशेष म्हणजे पवार कुटुंबातील कोणीही बोलत नाही. मात्र, आता, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहावं, असे जय पवार यांनी म्हटले. विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ दादा असतील बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो, असे म्हणत जय पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर अधिक बोलणे टाळले. विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे, त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असे जय पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.






















