Bharat Ganeshpure | माझा मोबाईल गाडीतून लुटून नेला; भारत गणेशपुरे यांचा थरारक अनुभव
मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांसह 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांनाही बसला. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर त्यांना वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. वाहतूक कोंडी झाली असताना एका टोळक्याने भारत गणेशपुरे यांचा मोबाईल फोन चक्क गाडीतून चोरला. स्वत: भारत गणेशपुरे यांनी हा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. माझ्या चुकीमुळे मोबाईल चोरीला गेला असं सांगत मदतीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीपासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.
तीन दिवसांपूर्वी मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळला. परिणामी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र रस्त्यावर आधीपासूनच असलेल्या गाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचाच फायदा घेत काही चोरांनी मदतीच्या बहाण्याने भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला.






















