SRA Housing Project | एसआरएसंदर्भात मोठा निर्णय घेणार; झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला 5 ते 10 वर्ष लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
आव्हाड म्हणाले की, एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख आहेत . बिल्डिंग बांधल्यानंतर ५ वर्षात घर विकता येत नाही. त्याऐवजी त्यांची झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करतोय, समिती त्याबाबत चर्चा करून लवकर निर्णय घेईल, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. बुधवार पार्क इथे 32 एकर झोपडपट्टी आहे. 16 एकरमध्ये 300 चौरस फूटाचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले आणि इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल . अशा ठिकाणी SRA आणि म्हाडा एकत्र घर बांधू, असं ते म्हणाले.
मंत्री आव्हाड म्हणाले की, बीडीडी चाळीच्या पुनर्विकास शुभारंभ या महिन्यात होणार आहे. वरळीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळ पुनर्विकास होणार असल्याचं ते म्हणाले.