Corona Vaccine | पोलिओच्या धर्तीवर घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण होणार?
मुंबई : देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईतही चित्र काहीसं वेगळं नाही. त्यातच मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवेल ही बाब खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बोलण्यातूनही अधोरेखित करण्यात आली. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अतिशय सविस्तर स्वरुपात महत्त्वाची माहिती देत मुंबईकरांना कठीण परिस्थित धीर देऊ केला.
मुंबईतील कोरोना परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे, याबाबतची माहिती देताना इक्बाल सिंह चहल यांनी काही आकडेवारी सादर केली. ज्या धर्तीवर त्यांनी सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी गोंधळून जाण्याचं काहीही कारण नसल्याचं म्हटलं. मुंबईत 10 फेब्रुवारी ते 7 एप्रिल दरम्यानच्या काळात मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसून आले असल्याचं सांगत या काळात 1 लाख 60 हजार कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये 1 लाख 36 हजार रुग्णांना लक्षणं नसल्याचंही निष्पन्न झालं. यापैकीसुद्धा अनेकांनीच रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिल्याचं म्हणत गरज नसल्याच चाचणी करु नका असं आवाहन त्यांनी केलं.






















