Maratha Reservation : मागण्या पूर्ण करा अन्यथा परिणाम गंभीर ; खा. उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित मुक आंदोलन पार पडल्यानंतर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM UDDHAV THACKERAY) यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं खासदार उदयनराजेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाले खासदार उदयनराजे
खासदार उदयनराजेंनी पत्रात म्हटलं आहे की, मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकिय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च येत आहे हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. चाळीस वर्षांचा काळ लोटला तरी मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज या मागणीपासून कदापी मागे हटणार नाही. जसे इतर समाजाला आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे, यात शंका नाही. आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे. त्यामुळे ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईपर्यत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी, जेणेकरून समाजाला तात्पुरता दिलासा मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे की, किमान पुढची पाऊले उचलताना मराठा समाज आश्वस्त होईल, अशी सरकारची भूमिका असली पाहिजे. विशेषत: न्या. भोसले समितीने ज्या काही बाबी सूचविल्या आहेत, त्यानुसार तातडीने पुढची पाऊले उचलली गेली पाहिजेत. तसेच राज्य मागासवर्ग आयोगात मराठा आरक्षणाचा प्रश्न समजणारे तज्ञ सदस्यांचा समावेश करून, त्यांचे सबग्रुप्स तयार करून न्या. भोसले यांनी जे ‘टर्म्स अँड रेफ्रन्स’ सांगितले आहेत, त्याप्रमाणे ‘एम्पिरिकल डेटा’ तयार करावा. याबाबी त्वरित झाल्या पाहिजेत. हे करीत असताना समाजाच्या ज्या भावना तीव्र आहेत, त्यावर तात्पुरता उपाय म्हणून खालील मागण्या तातडीने मंजूर कराव्या, असं त्यांनी म्हटलं आहे.



















