Mumbai Rain Dadar : मुंबईला यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
Mumbai Rain Dadar : मुंबईला यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिकडे कोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे. रायगडला पावसानं चांगलच झोडपलं आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये तुफान पाऊस पडतोय. माणगावमध्ये अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. गोरोगाव जवळील नागावमध्ये घरांमध्ये पाणी साचलं आहे. लोणेरे भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तिकडे गुहागरमधील पालशेतमध्ये नदीला पूर आल्यानं आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. रत्नागिरीच्या परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. तर आडिवरे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने महाकाली मंदिरपरिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तर रायगडच्या माणगाव, महाड, रोहा शहराला काल पावसाने झोडपलंय.






















