Ajit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi highway) अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर, महामार्गावरील प्रवासाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या टप्प्यातील हा प्रवास 520 किमीचाच होता. एकूण 701 किमीच्या या महामार्गातील उर्वरीत तीन टप्प्यांत काम प्रगतीपथावर असल्याने 181 किमीचे लोकार्पण बाकी होते. अखेर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते समृद्धी महामार्गावरील 4 थ्या टप्प्याचे नाशिकमधील (nashik) इगतपुरीत ते आमणे या 76 किमीच्या महामार्गाचे लोकार्पण झाले. त्यामुळे, 4 टप्प्यांच्या लोकार्पणानंतर 701 किमी समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते अनुक्रमे 2 आणि 3 टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते. समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार असून 76 किमीच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत. त्यात, समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा 8 किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो.
























