IND vs PAK, T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पार पडलेला सामना यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यापैकी सर्वात थरारक सामना असेल.


प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.


ट्वीट-






 


प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. अर्शदीपनं पाकिस्तानचा कर्णधार बाबरला शून्यावर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतरही भारतानं गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. अवघ्या चार धावांवर असताना रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं आठ चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी बुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.


हे देखील वाचा-