IND vs BAN : टी20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 184 धावा केल्या आहेत. विराट आणि राहुलनं अर्धशतक ठोकल्यामुळे भारतानं ही धावसंख्या उभारली आहे. भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला मात दिली असून बांगलादेशनही दोन विजय मिळवले आहेत. दोघांना प्रत्येकी एक सामना गमवावाही लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर 12 मधील चौथा सामना आज खेळणार आहेत. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा सामना महत्त्वाचा आहे.

  






सामन्यात सर्वात आधी बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण लवकर करायचा प्लॅन त्यांनी आखला होता. त्यानुसार बांगलादेशनं  भारताचा कर्णधार रोहितला अवघ्या 2 धावांवर तंबूतही धाडलं. राहुलही तसा हळू-हळू खेळत होता. पण विराट जोडीला आला आणि राहुल-विराटने फटकेबाजी सुरु केली.  50 धावा करुन राहुल बाद झाला, त्यानंतर सूर्यकुमारनेही 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मात्र पांड्या, अक्षर, कार्तिक स्वस्तात बाद झाले. अखेर आश्विनने 6 बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे किंग कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता बांग्लादेशचा संघ 185 धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेशकडून हसन महमूदनं 3 तर कर्णधार शाकीब अल् हसननं 2 विकेट्स घेतल्या.


राहुलचं अर्धशतक 


स्पर्धेत भारताचा सलामीवीर केएल राहुल सलग तीन सामन्यात फारत कमी धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण आज बांग्लादेशविरुद्ध त्यानं दमदार असं अर्धशतक ठोकत टीकाकारांची तोंडं बंद केली. अवघ्या 31 चेंडूत त्यानं 50 धावा ठोकल्या. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला असला तरी भारताला एक मजबूत सुरुवात त्यानं नक्कीच करुन दिली. सामन्यात सुरुवातीला काहीसा संथगतीने तो खेळत होता. पण काही चौकार आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत केएल राहुलनं 50 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता या स्पर्धेत होणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये राहुलच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष असेल.


हे देखील वाचा-


KL Rahul : हुश्श!!! क्लासिक केएल पुन्हा फॉर्मात, बांग्लादेशविरुद्ध 31 चेंडूत ठोकलं अर्धशतक