IND vs BAN, Pitch Report : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आज भारतासमोर बांग्लादेशचं (India vs Bangladesh) आव्हान असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल  क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. भारताने आधी पाकिस्तान, नेदरलँडला मात दिली असली तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पराभूत झाल्याने भारताला सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.


भारत आणि बांग्लादेश हे संघ आज ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. अॅडलेडची खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो.  येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारु शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. अॅडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.  


सेमीफायनल एन्ट्रीसाठी सामना महत्त्वाचा


भारताने विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तान, नेदरलँड यांना मात देत केली असली तरी रविवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभवामुळे भारताची विश्वचषकातील स्थिती काहीश अवघड झाली आहे. ज्यामुळे भारताला आता बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. पण या महत्त्वपूर्ण सामन्यात जर पाऊस झाला तर भारताला तोटा होऊ शकतो. कारण सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण मिळेल, ज्यामुळे भारत स्प्धेत अधिक आघाडी घेऊ शकणार नाही.   


कशी असू शकतो दोन्ही संघाची संभाव्य 11?


संभाव्य भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह


संभाव्य बांग्लादेशचा संघ  


नजमुल हुसैन शान्तो, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, नूरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद


भारत विरुद्ध बांग्लादेश Head to Head


टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि बांग्लादेश संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 10 सामन्यात विजय मिळवलाय. तर, बांग्लादेश संघाला फक्त एक सामना जिंकता आला आहे.