Shreyas Iyer, KKR captain: कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली. त्यांनी हैदराबादचा अख्खा डाव 159 धावांत गुंडाळला. त्यामुळं कोलकात्यासमोर विजयासाठी केवळ 160 धावांचं आव्हान होतं. कोलकात्यानं तब्बल 38  चेंडू आणि आठ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठलं. वेंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकं कोलकात्याच्या विजयात निर्णायक ठरली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्याआधी, मिचेल स्टार्कनं तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन विकेट्स काढून हैदराबादचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली होती.  


विजयानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला ?


फायनलमध्ये पोहचल्यानंतर श्रेयस अय्यर आनंदात होता. तो म्हणाला की, हैदराबादविरोधात मिळालेला विजय आनंदित करणारा आहे. प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावली. प्रत्येकजण जबाबदारीने खेळला. तुम्ही वेगवेगळ्या राज्यात प्रवास करता तेव्हा सातत्य राखणं सोपं नसतं. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आम्ही कोणीही गोष्टी हलक्यात घेत नाही, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहेत. गुरबाज आला आणि त्याने आमच्यासाठी प्रभावी सुरुवात केली, सुनील नारायण याने वेगवान फलंदाजी केली. माझ्यात आणि व्यंकटेशमध्ये फरक एवढाच आहे की मी तमिळ बोलत नाही (पण समजतो). तो माझ्याशी तमिळमध्ये बोलतो. या क्षणाचा आनंद लुटण्याची आणि अंतिम फेरीसाठी झोनमध्ये येण्याची आशा आहे.


पराभवानंतर पॅट कमिन्स काय म्हणाला...


क्वालिफायर 1 सामन्यात कोलाकात्याकडून पराभव झाल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं आपलं मत व्यक्त केले. तो म्हणाला की, "आजचा पराभव विसरण्याचा प्रयत्न करेल. टी20 क्रिकेटमध्ये तुमच्यासमोर असे दिवस येतच असतात. आमची सुरुवातच खराब झाली, हवी तशी फलंदाजी झाली नाही. गोलंदाजीही प्रभावी झाली नाही. सनवीर सिंह आज शेवटचा सामना खेळला. उमरान मलिकचा वापर करण्यासाठी आम्ही बॅटिंग सब वापरणार नाही असे वाटत होते, पण फलंदाजी ढेफाळल्यामुळे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंजाला उतरवावे लागले. हे काही चुकीचं नाही. खेळपट्टी चांगली होती, कोलकात्याची गोलंदाजी चांगली झाली. टी20 क्रिकेटमध्ये असं घडत असतेच. हे विसरुन पुढे जायचं असते. आता नवीन मैदानात खेळायला जाणार आहे. त्यासाठी पुन्हा सुरुवात करु.."


वेंकटेश अय्यर काय म्हणाला ?


मला फक्त मैदानात जाऊन फक्त फलंदाजी करायची होती. हैदराबादला 160 धावांत रोखू असेही वाटले नव्हते. आमच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, त्यामुळेच हैदराबादला कमी धावसंख्येवर रोखू शकलो. आम्ही 11 तारखेला अखेरचा सामना खेळलो होते.  आम्हाला शेवटचा सामना खेळायला मिळाला नाही पण आम्ही टेबल टॉपर होतो, त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला. आता आम्हालाही आयपीएल जिंकण्याची संधी आहे.  सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या आहेत. आम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करायचे होते, रिंकू हॉटस्पॉटमध्ये अप्रतिम आहे.