Ravi Shastri On Yuzvendra Chahal: राजस्थाननं (Rajasthan Royals) काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहलनं धक्कादायक माहिती शेअर केली होती. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळताना एका खेळाडूनं दारूच्या नशेत त्याला पंधराव्या मजल्यावरील बाल्कनीत लटकवल्याचं त्यानं सांगितलं होतं. ज्यानंतर क्रिडा विश्वात एकच खळबळ माजली. क्रिकेट चाहत्यांपासून आजी-माजी क्रिकेटपटूंनी या व्हिडिओवर आपलं मत मांडलं. दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया दिली. युजवेंद्र चहलसोबत धक्कादायक कृत्य करणाऱ्या खेळाडूवर अजीवन बंदी घालण्यात यावी,अशी मागणी रवी शास्त्री यांनी केली आहे.


रवी शास्त्री काय म्हणाले?
ईएसपीएनक्रिकइंफोच्या टी20 टाइम आऊट कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी युजवेंद्र चहलसोबत घडलेल्या या घटनेवर आपले मत मांडलं. हा विनोदाचा विषय नाही, यात कोण सामील आहे? हे मला माहीत नाही आणि याची कल्पनाही नव्हती. परंतु, युजवेंद्रसोबत घडलेला प्रकार चिंतेची बाब आहे. कुणाचा जीव धोक्यात आहे, काहींना हे मजेदार वाटेल. पण मला हे अजिबात योग्य वाटलं नाही. या प्रकारामुळं असं स्पष्ट होतं की, तो खेळाडू मानसिक दृष्या कमजोर आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन योग्य नसतं, तेव्हा तो काहीही करण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्याकडून अनेक चुका होण्याची शक्यता जास्त असते, हे मला अजिबात मान्य नाही".



युजवेंद्र चहलसोबत नेमकं काय घडलं?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थाननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल म्हणाला होता की, " मुंबईचा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना एकत्र येण्यासाठी बोलावण्यात आलं. मला त्याचं नाव सांगायला आवडणार नाही, पण एका खेळाडूनं खूप दारू प्यायली होती. तो खूप नशेत होता. त्यानं बराच वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग मला हाक मारली. त्यानं मला बाहेर जाण्यास सांगितले आणि 15 व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवलं. त्यावेळी मी पूर्णपणे घाबरलो होतो. मी त्या खेळाडूला घट्ट पकडलं. जर त्यावेळी माझा सटकला असता तर मी पंधराव्या मजल्यावरून खाली पडलो असतो. मात्र, काही वेळातच बाकीचे लोक बाल्कनीत आले आणि मला वर घेतलं. यानंतर मी बेशुद्ध झालो. इतर खेळाडूंनी मला पाणी दिल्यानंतर शुद्धीत आलो", असं युजवेंद्र म्हणाला. मात्र, यावेळी युजवेंद्रनं त्या खेळाडूचं नाव सांगितलं नाही.


हे देखील वाचा-