IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईचं (CSK) कर्णधार पद सोडलं. त्यानंतर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडं (Ravindra Jadeja) संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. या हंगामात चेन्नईच्या संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. या हंगामातील पहिल्या चारही सामन्यात चेन्नईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे. यावर भारताचं माजी प्रशिक्षक रवि शास्त्रीनं (Ravi Shashtri) काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रवि शास्त्री यांनी चेन्नईच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की, "चेन्नईच्या संघानं फाफ डू प्लेसिसला संघात कायम ठेवायचं होतं. तसेच फाफ डू प्लेसिसकडं संघाचं नेतृत्व सोपवायला हवं होतं. रविंद्र जाडेजानं केवळ त्याच्या खेळीवर लक्ष केंद्रीत करायचं होतं." सध्या फाफ डू प्लेसिस यंदाच्या हंगामात बंगळुरूच्या संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी बंगळुरूनं तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. 

आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईच्या संघानं चार खेळाडूला रिटेन केलं होतं. ज्यात रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंह धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाडचा समावेश होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईचा संघ फाफ डू प्लेसिसवर बोली लावेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु, बंगळुरूच्या संघानं त्याला खरेदी केलं. चेन्नईकडून खेळताना फाफ डू प्लेसिसनं चांगली कामगिरी केली आहे. चेन्नईच्या संघानं त्याला विकत न घेणे, हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. 

हे देखील वाचा-