बंगलोर : आयपीएलमधील बंगलोर आणि मुंबई संघामधल्या कालच्या सामन्याला अखेरच्या क्षणी वादाचं गालबोट लागलं. बंगलोरला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावा हव्या असताना लसिथ मलिंगाने टाकलेल्या चेंडूवर शिवम दुबेने एकेरी धाव घेतली आणि मुंबईच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष सुरु केला. पण टीव्ही रिप्लेमध्ये हा शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचं निदर्शनास आलं. मात्र ऑन फील्ड अंपायर एस रवी यांनी त्यावेळी नो बॉल घोषित न केल्याने हा सामना मुंबईने सहा धावांनी जिंकला.


सामना संपल्यानंतर बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने मात्र पंचांच्या या चुकीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ही चुकीची बाब आहे. आपण आयपीएलमध्ये खेळतोय, क्लब क्रिकेटचा सामना नाही. पंचांना डोळे उघडे ठेवायला हवे होते. अखेरच्या चेंडूवर अशाप्रकारचा निर्णय ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. अटीतटीच्या सामन्यात अशाप्रकारचे निर्णय दिले तर काय होईल, हे माहित नाही. पंचांना अधिक सजग राहायला हवं.



तर दुसरीकडे पंचांच्या निर्णयावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही नाराजी व्यक्त केली. मैदानाबाहेर गेल्यानंतर कोणीतरी सांगितलं की तो नो बॉल होता. क्रिकेटसाठी अशाप्रकारचे निर्णय योग्य नाही. आधीच्या षटकांमध्ये पंचांनी बुमराचा एक चेंडू वाईड दिला, पण तो वाईड नव्हता. अटीतटीच्या सामन्यात अशाप्रकारचे निर्णय महागात पडू शकतात.

पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला असता तर बंगलोरला केवळ एक चेंडूच मिळाला नसता तर एक अतिरिक्त धाव आणि एक फ्री हिटही मिळाली असता. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा आला असता.

मुंबईचा निसटता विजय
एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद 70 धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मुंबई इंडियन्सकडून अवघ्या सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात मुंबईने बंगलोरसमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत पाच बाद 181 धावांचीच मजल मारता आली. एबी डीव्हिलियर्सने 41 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 70 धावा कुटल्या. त्याआधी कर्णधार विराट कोहलीनेही 32 चेंडूत 46 धावांची खेळी केली. पण या दोघांच्या खेळीनंतरही बंगलोरचा विजय सहा धावांनी दूर राहिला. या विजयासह मुंबईने यंदाच्या मोसमातल्या पहिल्या विजयाची नोंद केली.