बंगळुरु : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेजर्स बंगलोरचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल-12 मधील पहिला विजय साजरा केला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात मुंबईनं बाजी मारली. बंगलोरकडून एबी डिव्हिलियर्सची 41 चेंडूतील 70 धावांची झुंज अपयशी ठरली.


जसप्रीत बुमराहने टाकलेली 19 वी ओव्हर सामन्यात निर्णायक ठरली. हार्दिक पंड्याने टाकलेल्या 18 व्या ओव्हरमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबेने 18 धावा काढल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या ओव्हरमध्ये बुमराहने केवळ 5 धावा देत सामन्याला कलाटणी दिली.


एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद 70 धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मुंबई इंडियन्सकडून अवघ्या सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मुंबईनं बंगलोरसमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत पाच बाद 181 धावांपर्यंत मजल मारता आली.


बंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने 46 धावा, पार्थिव पटेलने 31 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने चार ओव्हर्समध्ये 20 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तर मयंक मार्कंडेने एक विकेट घेतली.


त्याआधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत आठ बाद 187 धावसंख्या उभारली होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 33 चेंडूत सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं 38 तर हार्दिक पंड्यानं नाबाद 32 धावांचं योगदान दिलं.


क्विन्टन डिकॉकने 23, आणि युवराज सिंगने 12 चेंडून 23 धावांची खेळी केली. बंगलोरकडून यजुवेंद्र चहलनं 38 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.