इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावात 'अॅशेस'च्या धर्तीवर भारत-पाकिस्तानमध्ये गांधी-जिन्ना ट्रॉफीचा उल्लेख आहे. यानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये वार्षिक द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची ऑफर आहे. खुद्द पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक चणचण भासत असलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने दोन्ही देशात क्रिकेट पूर्ववत होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे, पण त्यामध्ये यश आलेलं नाही.


झका अश्रफ म्हणाले, मी बीसीसीआयला अॅशेसच्या धर्तीवर गांधी-जिन्ना ट्रॉफीचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या मालिकेसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ एक-एक करून एकमेकांच्या देशाला भेट देऊ शकतात.


शेवटची द्विपक्षीय मालिका 2014 मध्ये 


2014 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. हे संघ गेल्या 9 वर्षांत केवळ विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेत भाग घेत आहेत. अशा स्पर्धांमध्ये जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी असते. याचा फायदा दोन्ही क्रिकेट बोर्डांना होतो.


रमीझ राजांकडून तिरंगी मालिकेचा प्रस्ताव


याआधीही पाकिस्तानकडून भारत-पाक सामने आयसीसी स्पर्धेबाहेर आयोजित करण्याचे प्रस्ताव आले आहेत. पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी गेल्या वर्षी तिरंगी मालिकेद्वारे नियमित भारत-पाकिस्तान सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावांतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तिसऱ्या देशात आयोजित करण्याची ऑफर होती. सध्या पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आहे. याआधी पाकिस्तानचा संघही टी-20 विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. भारतीय संघ बराच काळ पाकिस्तानला गेला नसला तरी पाकिस्तानला आयसीसीच्या मालिकांसाठी यावं लागलं आहे. 


14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तानमध्ये थरार 


दुसरीकडे, 14 ऑक्टोबर रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याइतकाच महत्त्वाचा आहे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. अहमदाबाद येथे होणार्‍या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या लढतीबद्दल विचारले असता गावसकर म्हणाले की, सामान्य माणसाला या सामन्याची खूप काळजी होती आणि म्हणूनच ही स्पर्धा स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असेल. "आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे पण हा सामना महत्त्वाचा आहे. अपेक्षांच्या बाबतीत, तुम्ही सामान्य माणसाला विचारले तर तो म्हणेल की तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध जिंकायचे आहे, पण आमच्याकडे विश्वचषक जिंकायचा आहे. आम्ही निश्चितच फेव्हरेट आहोत, त्याबद्दल प्रश्नच नाही,” असेही सुनील गावसकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या