कोलकाता : ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात टीम इंडियानं तिसऱ्याच दिवशी बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 2-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. टीम इंडियाचा भारतीय भूमीवरचा हा सलग 12 वा कसोटी विजय ठरला. 2012 पासून टीम इंडियाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीचं भरभरून कौतुक केलं. पण विराटच्या या कृतीवर लिटल मास्टर म्हणून ओळख असणाऱ्या सुनील गावस्करांनी मात्र सणसणीत प्रतिउत्तर दिलं.


सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, 'वनडे आणि टी-20 प्रमाणेच टेस्ट क्रिकेट मार्केटही फार महत्त्वाचं आहे.' तसेच पुढे बोलताना त्याने सांगितले की, सौरव गांगुली कर्णधार असतानाही भारतीय संघाने उल्लेखनिय कामगिरी केली होती. खरं तर दादाच्या संघाने याची सुरुवात केली आणि त्यांनी सुरु केलेली ही विजय परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत'.

टीम इंडियाने रचले नवे विश्वविक्रम, मायदेशात सलग बारावा कसोटी मालिकाविजय

दरम्यान, कोहलीच्या या गोष्टीवर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर म्हणाले की, 'असं अजिबात नाही, टीम तेव्हाही जिंकत होती, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता'.

सामना संपल्यानंतर गावस्कर म्हणाले की, 'हा खरंच ऐतिहासिक विजय आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणाला की, या गोष्टीला 2000मध्ये सुरुवात झाली होती. जेव्हा गांगुली कर्णधार होते. मला माहित आहे की, सध्या दादा बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे कदाचित कोहली त्यांच्याबाबत एवढं चांगलं बोलत असतील, परंतु भारत 1970 आणि 1980 मध्ये जिंकत होता, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता.' तसेच पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, 'अनेक लोकांचा आजही असाच गैरसमज आहे की, क्रिकेटी सुरुवात 2000 साली झाली होती. पण भारतीय संघाने परदेशात 1970 आणि 1986च्या दशकात सीरीजही जिंकली होती.

IND vs BAN : कोहलीची 'विराट' कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक कोलकाता कसोटीत (दुसऱ्या दिवशी) खणखणीत शतक झळकावलं. डे-नाईट कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकावण्याचा मान विराटनं मिळवला. तायजुल इस्लामच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत 159 चेंडूत विराटनं शतकाला गवसणी घातली. त्याच्या या शतकी खेळीत 12 चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 27 शतकं झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. 141 डावांत विराटने आपलं 27 वं शतक झळकावलं आहे.