Sanjay Banger On Virat Kohli: विराट कोहली हा आकडेवारीच्या आधारे भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. आता टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी मोठे विधान केले असून विराटने कर्णधारपद कायम ठेवायला हवे होते, असे म्हटले आहे. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 40 कसोटी सामने जिंकले आहेत.


संजय बांगर काय म्हणाले?


पॉडकास्टवर चर्चा करताना संजय बांगर म्हणाले, मला वैयक्तिकरित्या वाटते की विराट कोहलीने दीर्घ कालावधीसाठी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवायला हवे होते. विराट कोहलीने 65 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यापुढेही कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधारपदाची भूमिका कायम ठेवायला हवी होती, असं संजय बांगर यांनी सांगितले.






विराट कोहलीची मानसिकता काय होती?


विराट कोहलीची मानसिकता संघाला परदेशात जास्तीत जास्त सामने जिंकण्यास मदत करण्याची होती. कारण त्यावेळी भारताने घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघ घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक वेळा जिंकेल असा विश्वास होता. त्यामुळे भारताने परदेशी खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करावी अशी विराट कोहलीची इच्छा होती.


विराट कोहलीचा कर्णधारपदाचा विक्रम-


विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 वेळा संघाने विजय मिळवला. विराट कोहली हा केवळ भारताला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणारा खेळाडू नाही तर त्याची विजयाची टक्केवारी एमएस धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा खूपच चांगली आहे. 2014/2015 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कोहलीने पहिल्यांदा टीम इंडियाची कमान सांभाळली. त्यानंतर, कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी 54.80 च्या सरासरीने 5,864 धावा केल्या आहेत.


विराट कोहलीच्या 8848 धावा-


सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली 19 व्या क्रमांकावर आहे. त्याने 113 कसोटी सामने खेळले आहेत. या 113 सामन्यांमध्ये त्याने 55.56 च्या स्ट्राइक रेटने 8848 धावा केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 30 अर्धशतके आणि 29 शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद 254 धावा.


संबंधित बातमी:


'नीरज चोप्रा नव्हे...या क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायचाय'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!