Team India T20 World Cup Semi Final Scenario दुबई : महिला टी 20 वर्ल्ड कपच्या अ गटात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील लढत पार पडली. या लढतीत भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही हे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या हातात आहे. या दोन्ही संघांच्या लढतीच्या निकालानंतर भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल की नाही हे स्पष्ट होईल. 


 न्यूझीलंडनं पाकिस्तानला पराभूत केल्यास भारतीय संघ स्पर्धेबाहेर जाईल. पाकिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केल्यास भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल, मात्र त्यातही एक अट आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर अ गटातील चित्र असं आहे. ऑस्ट्रेलियानं 8 गुण आणि +2.22. या नेट रनरेटसह पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या स्थानावर सध्या 4 गुणांसह आणि+0.322 नेट रनरेटसह भारत आहे. न्यूझीलंड 4 गुणासंह +0.282 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानकडे 2 गुण असून त्यांचं नेट रनरेट-0.488 इतकं आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत. 


पाकिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केल्यास नेट रनरेटच्या जोरावर भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. मात्र, पाकिस्तानचा विजय निसटता असला पाहिजे. पाकिस्ताननं न्यूझीलंडला 53 पेक्षा अधिक धावांनी पराभूत करु नये आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करत असल्यास 9.1 ओव्हरमध्ये विजय मिळवू नये. हे समीकरण पहिल्या डावातील 150 धावांचा अंदाज धरुन काढलं आहे. 


पाकिस्ताननं न्यूझीलंडला 53 धावांपेक्षा अधिक धावांनी विजय मिळवल्यास किंवा 9.1 ओव्हरमध्येच त्यांनी धावा पूर्ण करत विजय मिळवल्यास त्यांचं नेट रनरेट भारतापेक्षा पुढं जाईल, अशा स्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल. 


पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी 11 लढती झाल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडनं 9 वेळा विजय मिळवला आहे तर पाकनं 2 वेळा विजय मिळवला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ तीन वेळा आमने सामने आलेत. यामध्ये पाकिस्तान तीनवेळा पराभूत झालं आहे. 


हरमनप्रीत कौर लढली पण भारताचा पराभव


ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला विजयासाठी 152 धावांचं आव्हान होतं.  भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं 47 धावांमध्ये 3 विकेट गमावल्या होत्या. आक्रमक फलंदाज स्मृती मानधना या मॅचमध्ये देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी 63 धावांची भागिदारी केली. हरमनप्रीत कौरनं 54 धावा केल्या मात्र ती संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही. 


इतर बातम्या :


India Semi Final Scenario : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव; पाकिस्तानच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात, जाणून घ्या उपांत्य फेरीचे समीकरण


Mumbai Indians : लिलावाआधी मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल; रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?