R Ashwin News : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू आर अश्विनला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आलं. अश्विननं या सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विशेष म्हणजे या कामगिरीमुळे अश्विनला 9व्यांदा 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला. त्यामुळे 18 व्यांदा त्याला ही ट्रॉफी देण्यात आली. यामुळे त्याने राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे या दिग्गजांना मागे टाकलं आहे.


अश्विनला 9 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' आणि 9 वेळा 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार मिळाला आहे. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 15 वेळा, अनिल कुंबळेने 14 वेळा आणि वीरेंद्र सेहवागने 13 वेळा या ट्रॉफी जिंकल्या आहेत. या प्रकरणात, भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर 19 वेळा ट्रॉफी जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सर्वाधिक वैयक्तिक कसोटी ट्रॉफी जिंकण्यात अश्विनने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटशी बरोबरी साधली आहे. रुटने आतापर्यंत कसोटीत 18 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे ट्रॉफी जिंकली आहे.


सर्वाधिक 'मॅन ऑफ द सीरीज' अश्विनच्या नावावर


सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या सर्वांपेक्षा आर अश्विनने सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकला आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 14 'मॅन ऑफ द मॅच' आणि 5 'मॅन ऑफ द सीरीज' जिंकले आहेत. याशिवाय वीरेंद्र सेहवागने 8 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' आणि 5 वेळा 'मॅन ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकला आहे. दुसरीकडे, अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत 11 'मॅन ऑफ द मॅच' आणि 4 वेळा 'मॅन ऑफ द सीरीज' जिंकला आहे. राहुल द्रविड आपल्या कारकिर्दीत 11 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' आणि 4 वेळा 'मॅन ऑफ द सिरीज' बनला आहे. पण या सर्वांना मागे टाकत अश्विनला 9 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' आणि 9 वेळा 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार मिळाला आहे.


अश्विननं बांगलादेशविरुद्ध केला खास विक्रम 


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवीचंद्रन अश्विनने भारताकडून 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाचा डाव सावरताना 42 धावांची नाबाद खेळी केली. य़ा खेळीमुळेच भारत तीन गडी राखून सामना जिंकला. दरम्यान या खेळीसह अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्ट इंडिजचा फलंदाज विन्स्टन बेंजामिनचा एक मोठा विक्रम मोडला आहे. 1988 मध्ये बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 धावा केल्या होत्या. आता अश्विनने 42 धावा करत हा विक्रम मोडीत काढला आहे. अश्विन आता कसोटीत 9व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.


हे देखील वाचा-