Leicestershire vs India: लिसेस्टशायरविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी (Team India) दमदार प्रदर्शन करून दाखवलं. लिसेस्टशायरच्या संघ त्यांच्या पहिल्या डावात 244 धावांवर ढेर झाला. लिसेस्टशायरकडून खेळताना ऋषभ पंतनं (Rishabh Pant) 76 धावांची खेळी केली. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami), रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) भेदक गोलंदाजी केली. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपूपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 80 धावा केल्या.


शामी-सिराजनं लिसेस्टरशायरच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं
या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं 246 धावांवर डाव घोषित केला. यानंतर लेस्टरशायरची सलामीची जोडी खेळपट्टीवर उतरली. लिसेस्टशायरची धावसंख्या 14 धावांवर पोहोचली असताना मोहम्मद शमीनं लीसेस्टरचा कर्णधार सॅम इव्हान्सला (1) माघारी धाडलं. यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात त्यानं चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केलं. सिराजनंही दुसऱ्या टोकाकडून लिसेस्टरशायर संघाला धक्के देण्यास सुरुवात केली. त्यानं सलामीवीर लुईस किम्बर (31) आणि जॉय इव्हिसन (22) यांची विकेट्स घेतली. लिसेस्टशायरचा संघानं 71 धावापर्यंत पोहचण्यापर्यंत चार विकेट्स गमावल्या.


ऋषभ पंतनं लिसेस्टशायरच्या संघाचा डाव सावरला
ऋषभ पंत आणि ऋषी पटेल यांनी लीसेस्टरशायरला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. ऋषी पटेलही 34 धावा करून मोहम्मद शमीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर ठराविक अंतरानं विकेट पडत राहिल्या. 87 चेंडूत 76 धावा करून ऋषभ पंत रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.


भारताची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात 
भारतीय संघाने दुसऱ्या डावात केएस भरतला सलामीवीर म्हणून पाठवलं. भारतनं शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. गिल 38 धावा करून नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. केएस भरत (31) आणि हनुमा विहारी (9) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 80 धावा केल्या आहेत. 


भारताचा पहिला डाव 246/8 वर घोषित
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (25) केवळ 35 धावांवर आपली विकेट गमावली. पहिल्या डावात भारतानं 90 धावांच्या आत पाच विकेटस् गमावल्या. केएस भरत आणि विराट कोहली यांनी 57 धावांची भागीदारी करत संघाला डाव सावरला. या सामन्यात विराट कोहली मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, या सामन्यातही त्यानं 33 धावांवर असताना आपली विकेट गमावली.  पहिल्या दिवशी भारताने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या आहेत.  लेस्टरशायरचा वेगवान गोलंदाज  रोमन वॉकरने पाच विकेट्स घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी आणि शार्दुल ठाकूरला बाद केलं.


हे देखील वाचा-