J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
Jammu & Kashmir beat Bengal Ranji Trophy 2026 : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बलाढ्य बंगालचा पराभव करत त्यांनी प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बलाढ्य बंगालचा पराभव करत त्यांनी प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या दिवशी सकाळी 126 धावांचे लक्ष्य सहज गाठत जम्मू-काश्मीरने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. हा विजय जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण ठरला.
या सामन्याचा खरा हरक आकिब नबी ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात एकूण 9 बळी घेत बंगालच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पहिल्या डावात त्याने 5 बळी घेतले, तर दुसऱ्या डावातही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. गोलंदाजीसोबतच अब्दुल समदनेही फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याने 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर दुसऱ्या डावात नाबाद 30 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावरून पार नेले.
बंगालचा दुसरा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला
सोमवार 16 फेब्रुवारीपर्यंत सामना चुरशीचा दिसत होता. मात्र मंगळवारी 17 फेब्रुवारीला चित्र पूर्णपणे बदलले. आकिब नबी डार (4/36) आणि सुनील कुमार (4/27) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगालचा दुसरा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला. त्यामुळे जम्मू-काश्मीरला विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य मिळाले.
तिसऱ्या दिवसाअखेर जम्मू-काश्मीरने 2 बाद 43 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी त्यांना केवळ 83 धावांची गरज होती. वंशज शर्माच्या नाबाद 43 धावा आणि अब्दुल समदच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले आणि अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.
मोहम्मद शमीला 9 विकेट्स...
या सामन्यात जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 302 धावांवर संपला. बंगालकडून मोहम्मद शमीने पहिल्या डावात 90 धावांत तब्बल 8 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात 1 बळी मिळवला. एकूण 9 बळी घेत शानदार कामगिरी करूनही शमीला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. मात्र या प्रभावी कामगिरीमुळे त्याने भारतीय संघातील पुनरागमनासाठी आपली दावेदारी नक्कीच केली आहे.
जम्मू-काश्मीर जेतेपदासाठी कोणाला भिडणार?
या ऐतिहासिक विजयासह जम्मू-काश्मीर हा हिमालयीन पट्ट्यातील पहिला संघ ठरला आहे, ज्याने भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रथम श्रेणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. जम्मू-काश्मीरसाठी हा केवळ विजय नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
हे ही वाचा -





















