Sarfaraz Khan: रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2022) दमदार प्रदर्शन करून मुंबईचा फलंदाज सर्फराजनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एवढेच नव्हे तर, बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. परंतु, सध्याचा भारताचा कसोटी संघ पाहता सर्फराजला भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं थोडं कठीण मानलं जातंय. भारतीय कसोटी संघात सध्या मधल्या फळीत विराट कोहली व्यतिरिक्त शुभमन गिल, हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळांडूचा पर्याय आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं चांगली फलंदाजी केली तर, पुन्हा त्याची तिसऱ्या क्रमांकावर जागा पक्की होईल. 


दरम्यान, सर्फराज भारतीय कसोटी संघाच्या पाचव्या क्रमांकावर जागा पक्की करू शकतो. परंतु, या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी मैदानात येतोय. इतकंच नाही तर हनुमा विहारी आणि शुभमन गिल गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात आपलं स्थान पक्के करण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत.


भारत 'अ' संघात सर्फराजचं स्थान निश्चित
भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतरही सर्फराज खानला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र, सर्फराजसाठी भारत अ संघाचा मार्ग आता  खुला झाला आहे. रणजीतील चांगल्या कामगिरीनंतर सर्फराज खानला भारत अ संघात स्थान मिळणं निश्चित आहे. सर्फराजनं भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करत राहिल्यास त्याला भारतीय संघात स्थान मिळवणं सोपं जाईल.


सर्फराजची चमकदार कामगिरी
रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सर्फराज खाननं सहा सामन्यातील आठ डावात 937 धावा केल्या. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सर्फराज अव्वल स्थानी आहे. त्याची सरासरी 130 पेक्षा अधिक आहे. यादरम्यान त्यानं चार शतक आणि दोन अर्धशतक केली आहेत. रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामातही त्यानं दमदार प्रदर्शन करून दाखवलं. मागील हंगामात त्यानं 154.66 च्या सरासरीनं 928 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांचा समावेश होता.


हे देखील वाचा-