कोलंबो: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. तीन पैकी दोन मॅच पार पडलेल्या आहेत. पहिली मॅच टाय झाली तर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला आहे. यामुळं श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेनं 8 विकेटवर 230  धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघ 230 धावांवर बाद झाला होता. त्यामुळं अनेकांना मॅचचा निकाल सुपर ओव्हरद्वारे (India vs Sri Lanka 1st ODI Super Over Rule) लावला जाईल, असं वाटलं होतं. मात्र, सुपर ओव्हर खेळवण्यात आली नाही. मॅच टाय झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सुपर ओव्हर देखील का खेळवण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता सुपर ओव्हर संदर्भातील नियमाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं पहिल्या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली नाही, असं देखील बोललं जातंय.  


दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार श्रीलंकेच्या एका अधिकाऱ्याच्या नाव छापण्याच्या अटीवर माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर2023 मधील एकदिवसीय सामन्यांच्या नियमांनुसार सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध होता. याशिवाय दोन्ही बोर्डांनी केलेल्या करारात देखील सुपर ओव्हरचा उल्लेख होता.  


सुपर ओव्हरच्या नियमाकडे दुर्लक्ष


डिसेंबर 2023 मध्ये पुरुष क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यांबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. 16.3.1.1 नुसार जेव्हा एकदिवसीय सामना टाय होईल तेव्हा सुपर ओव्हर घेतली जावी, असा नियम आहे. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर घेण्यात यावी असं म्हटलंय. मात्र. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅचमध्ये सुपर ओव्हरच्या नियमांकडे दुर्लक्ष  करण्यात आलं. आयसीसीच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आयसीसी अधिकारी, मॅच रेफरी आणि पंचांची असते, असा दावा करण्यात आला आहे.  


'द मॉर्निंग टेलिग्राफ' मधील एका रिपोर्टनुसार आयसीसीच्या अधिकाऱ्यानं या वनडे मालिकेत पुन्हा एखादी  मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल, असं म्हटलं.  


पहिली वनडे टाय, दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच टाय झाली. दुसऱ्या मॅचमध्ये भारताला 32  धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 9 बाद 240 धावा केल्या होत्या. तर, भारतीय संघ 42.2 ओव्हरमध्ये 208 धावांवर बाद झाला.  


दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे मॅच 7 ऑगस्टला होणार आहे. भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. 


संबंधित बातम्या : 



Ind vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया का ढेपाळली...?; जाणून घ्या, पराभवामागील 5 महत्वाची कारणं