IND vs SA 4th T20I: राजकोट येथे पार पडलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात (India vs South Africa) भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खाननं महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 18 धावा देऊन चार फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आवेश खानला एकही विकेट्स मिळवता आली नाही. ज्यामुळं त्याला भारतीय संघातून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला चौथा सामना खेळण्याची संधी दिली. या सामन्यात चार विकेट्स घेऊन आवेश खाननं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. या सामन्यात त्यानं केलेली लक्ष वेधीत कामगिरी त्याच्या वडिलांना समर्पित केलीय.


आवेश खान काय म्हणाला?
"मी खूप आनंदी आहे. आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि हे यश मी त्यांना समर्पित करू इच्छितो".एका षटकात तीन विकेट मिळाल्यावर आवेश म्हणाला, "रासीची विकेट घेतल्यानंतर मी क्षेत्ररक्षकाला फाईन लेगवर परत पाठवलं.ऋषभ पंतनं कटर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. त्याचा मुद्दा मला लक्षात आला. त्यानंतर स्लोअर बॉलवर मला केशव महाराजांची विकेट मिळाली. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. पुढील सामन्यात यात आणखी सुधारणा करण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न असेल.


पहिल्या तीन टी-20 सामन्यातील आवेश खानची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आवेश खानला एकही विकेट्स मिळवता आली नाही. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीवर टीका केली जात होती. त्यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 8 च्या आत होता. मात्र, चौथ्या टी-20 सामन्यात आवेश खाननं आक्रमक रूप धारण करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच कंबरडं मोडलं. या सामन्यात त्यानं चार षटक टाकली. ज्यात 18 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. 


भारताचा 82 धावांनी चौथा टी-20 सामना जिंकला
या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सुरुवातीपासूनच ठराविक अंतरानं विकेट्स गमावणं सुरूच ठेवलं. दक्षिण आफ्रिकेकडून रासी व्हॅन डेर डुसेननं सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.


हे देखील वाचा-