India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकात 308 धावा केल्य़ा आहेत. 7 गडी गमावत भारताने ही धावसंख्या गाठली असून आता विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या आहेत. भारताकडून कर्णधार शिखरने सर्वाधिक 97 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने दमदार अर्धशतकं ठोकली आहेत.




 


सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेणार असल्याने दोघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताने सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी सुरु केली. शिखर आणि शुभमन जोडीने दमदार फलंदाजी करत शतकी भागिदारी पूर्ण केली. संघाच्या 119 धावा झाल्या असताना शुभमन 64 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर शिखर 97 धावा करुन तंबूत परतला. मग श्रेयसने सर्व जबाबदारी घेतली. पण तो देखील 54 धावा करुन बाद झाला.


ज्यानंतर मात्र पुढील सर्व फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. हुडा (27) आणि अक्षर पटेल (21) यांनी काहीशी फिनिशिंग करत धावसंख्या पुढे नेली. ज्यामुळे आता वेस्ट इंडीजला 309 धावा जिंकण्यासाठी करणं अनिवार्य आहे. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोटे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रोमारियो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.


हे देखील वाचा-