IND vs SA : रविचंद्रन अश्विन गौतम गंभीरवर भडकला, टीम इंडियाच्या ऑलराऊंडरचं नाव घेत सुनावलं, म्हणाला...
IND vs SA ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उद्या विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्यापूर्वी अश्विननं गंभीरवर संताप व्यक्त केला आहे.

विशाखापट्टणम : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यावर टीका केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी आर. अश्विननं गौतम गंभीरला एक सल्ला दिला आहे. अश्विन म्हणाला गौतम गंभीरला ठरवावं लागेल आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याची टीममध्ये काय भूमिका आहे हे समजावून सांगावं लागेल. वॉशिंग्टन सुंदर या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे करु शकलेला नाही. पहिल्या वनडेत त्याला पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आलं तर दुसऱ्या वनडेत सहाव्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आलं.
वॉशिंग्टन सुंदरनं पहिल्या वनडेत 13 धावा केल्या तर दुसऱ्या वनडेत त्यानं केवळ 1 रन केली. तर, दोन्ही मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. दोन्ही मॅचमध्ये त्यानं केवळ 7 ओव्हर गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात आलं तर दुसऱ्या कसोटीत त्याला पुन्हा लोअर ऑर्डरला फलंदाजीला पाठवण्यात आलं होतं.
अश्विन गंभीरवर संतापला
टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमात होत असलेल्या बदलांवरुन आर. अश्विन यानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर भाष्य केलं. "जेव्हा तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला खेळवत आहात तेव्हा पहिल्यांदा त्याला एक असा गोलंदाज मानावं लागेल जो फलंदाजी देखील करु शकतो. तुम्ही त्याच्याकडून पूर्ण ओव्हर गोलंदाजी करुन घेतली पाहिजे.तुम्ही त्याच्याकडे गोलंदाजी करुन घेतली तर त्याची मानसिकता फलंदाजी करु शकणारा गोलंदाज अशी राहू शकते. जर तो काही ओव्हर गोलंदाजी करत असेल आणि कोणत्याही स्थानावर फलंदाजी करत असेल तर स्वत: ची ओळख गमावून बसेल, असं अश्विननं म्हटलं.
अश्विन पुढं म्हणाला की टीम मॅनेजमेंटनं वॉशिंग्टन सुंदरला अशा स्थितीत जाऊ देऊ नये. वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जबाबदारीसंदर्भात योग्यपणे सांगितलं गेलं पाहिजे, असं अश्विननं म्हटलं.
फिनिशरची कमी
रविचंद्रन अश्विन यानं भारतीय संघात एकही फिनिशर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय संघानं दुसऱ्या वनडे 40 ओव्हर 284 धावा केल्या होत्या. मात्र, पुढच्या 10 ओव्हरमध्ये भारताला 74 धावा करता आल्या. अश्विननं म्हटलं की हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत त्याच्यासारखा मोठे फटके मारणारा नितीश कुमार रड्डी बेंचवर आहे.
दरम्यान, तिसऱ्या वनडेत भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्या विशाखापट्टणम येथे आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्यानं तिसऱ्या वनडेत विजयी होणारा संघ मालिका जिंकेल.




















