IND vs WI, 3rd ODI : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी संपली असून आता वेस्ट इंडीजचा संघ बॅटिंग करत आहे. सामन्यात सतत पावसाचा व्यत्यय येत असल्याने भारताचा डाव 36 षटकांवर थांबवण्यात आला असून आता वेस्ट इंडीजला 35 षटकांत विजयासाठी 257 धावा करायच्या आहेत.


सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकांत 257 रन करायचे आहेत.



या सामन्यासाठी दोन्ही संघानी मागील सामन्यातील संघ खेळवला नसून बदल केला आहे. यावेळी भारतीय संघात केवळ एक बदल झाला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळाली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजमध्ये त्यांचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर जो कोरोनातून सावरुन आता संघात परतला आहे. वेस्ट इंडीजने जेसनसह आणखी दोन खेळाडू संघात घेतले आहेत. यामध्ये केसी कार्टी आणि किमो पॉल याचं नाव आहे. या तिघांच्या जागी संघात रोव्हमेन पॉवेल, रोमारियो शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ यांना विश्रांती देण्यात आली आहे.