नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राजच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी मिताली राज व्यतिरिक्त भारताचा नंबरवन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​नावही पाठविण्यात येणार आहे. अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने तीन खेळाडूंची नावे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.


अर्जुन पुरस्कारासाठी बोर्ड सीनियर फलंदाज शिखर धवन, लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे पाठवेल. गेल्या वर्षी धवनच्या नावाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, अर्जुन पुरस्कारासाठी कोणत्याही महिला क्रिकेटपटूचे नाव पाठवलेले नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन पुरस्कारासाठी कोणत्याही महिला क्रिकेटपटूला नामांकन मिळालेले नाही. खेल रत्नासाठी मितालीच्या नावाची शिफारस केली गेली आहे.


क्रीडा मंत्रालयाने नेमलेल्या समितीने ऑलिम्पिक वर्षात मितालीला या पुरस्कारासाठी निवडतो की नाही हे पाहणे बाकी आहे. मितालीने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे पूर्ण केली. 38 वर्षीय मिताली एकदिवसीय सामन्यात सात हजाराहून अधिक धावा करणारी सर्वात यशस्वी फलंदाज आहे.


खेल रत्नसाठी हॉकी इंडियाकडून श्रीजेश आणि दीपिका यांची नावे तर अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन जाहीर


मिताली आणि अश्विन यांना याआधी मिळालाय अर्जुन पुरस्कार
मितालीप्रमाणेच अर्जुन पुरस्कार जिंकणार्‍या अश्विननेही कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 79 कसोटी सामन्यांत 413 विकेट घेतल्यात. याव्यतिरिक्त त्याने वन डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे 150 आणि 42 गडी बाद केलेत. मात्र, सध्या तो छोट्या प्रकारात भारताकडून जास्त खेळत नाही. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.


धवन श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताचा कर्णधार असेल आणि अर्जुन पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. डाव्या हाताच्या या फलंदाजाने 142 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5977 धावा केल्या असून कसोटी क्रिकेट आणि टी -20 सामन्यात भारतासाठी अनुक्रमे 2315 आणि 1673 धावा केल्या आहेत. त्यामुळे यावेळी धवनला पुरस्कार देण्यात यावा अशीच सर्वांची इच्छा आहे.