Wetlands: पाणथळ जागा तशा दुर्लक्षित केल्या जातात. जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमधील रामसर या ठिकाणी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांच संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं ठरलं. पण 1997 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.


भारत हा या रामसर कराराचा एक सदस्य देश असल्याने भारतातील एकूण 27 जागांचा 'रामसर पाणथळ' (Ramsar Wetlands) मध्ये समावेश होतो. महाराष्ट्रातील एकही जागेचा यात समावेश होत नाही.

कोरल रिफ्स, मॅनग्रुव्ह, नदी, तलाव, समुद्र किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला दिसून येतात. तसेच यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, भाताची शेती, मिठागरे, तलाव, मत्सशेतीचे तलाव, शेततळी अशा स्थळांचाही समावेश होतो. आपण भूभागातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. अनेकदा मानवनिर्मीत प्रदूषित पाणी आणि हानिकारक रसायने पाण्याच्या माध्यमातून जमिनीत सोडली जातात.

Indian Army Day 2021 | दरवर्षी 15 जानेवारीला का साजरा केला जातो सैन्य दिवस? या दिवसाचं महत्व काय?

पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती हे प्रदूषित घटक शोषून घेण्याचं काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी शुद्ध होण्यास मदत होते. त्या ठिकाणच्या मॅनग्रुव्ह वनस्पती या निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. भाताच्या शेती या सर्वात मोठ्या पाणथळ जमिनी म्हणून ओळखल्या जातात. त्या माध्यमातून जगभरातील 3 अब्ज लोकांना रोजचे अन्न मिळते असे एका अहवालात नमूद करण्यात आलंय. तसेच समुद्र किनारी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे किनाऱ्यांची होणारी धूप थांबते आणि जमिनी क्षारपड होत नाहीत. तसेच या वनस्पतींचा वापर औषधाच्या रुपात मोठ्या प्रमाणात केला जातो.

हे पाणथळ प्रदेश हे अनेक पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहेत. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असत्तात.

या वर्षीची थीम
दरवर्षी हा दिवस साजरा करताना एक थीम निवडण्यात येते. या वर्षीची थीम ही Wetlands and Water अशी आहे. आजच्या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतंय. पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर या पाणथळ जमिनींचं ही संवर्धन करणं आवश्यक आहे.

Swami Vivekanand birth anniversary: जगाला धर्माचा खरा अर्थ सांगणारे स्वामी विवेकानंद