Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती पाहून भारतीय दूतावासाने युक्रेनमधील तब्बल 18 हजार भारतीयांसाठी वारंवार सूचना दिल्या होत्या. तेथील परिस्थिती अधिकच चिघळल्यामुळे भारतीयांना एयरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. युद्धमुळे हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे भारतीयांना आणण्यासाठी इतर मार्गाचा विचार केला जात आहे. विदेश राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले आहे. 


युक्रेनमधील प्रत्येक शहरात तणावाची स्थिती झाली आहे. चारीबाजूने रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे युक्रेनमधील तब्बल 18 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. हवाई सीमा बंद असल्याने अन्य मार्गांची चाचपणी केली जात आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले, त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत.


युक्रेनमध्ये मिसाईलपासून बॉम्बचे आवाज येत आहेत. रशियाचे सैनिक युक्रेनमध्ये दाखल होत आहे. युक्रेनमध्ये 18 हजार पेक्षा जास्त भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी सूचना जारी केल्या आहेत. गूगल मॅपच्या मदतीने हल्ला होणाऱ्या ठिकाणापासून दूर जा.. असा सल्ला देण्यात आला आहे. ‘येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. युद्धाच्या स्थितीत आम्ही काम करत आहे. या स्थितीमध्ये मार्ग शोधत आहेत. हवाई सीमा बंद आहेत. त्यामुळे इतर मार्गाची चाचपणी सुरु आहे, असे कीवमधील भारतीय दूतावासाने सांगितले.’ 






आणीबाणीची बातमी मिळताच मायदेशी परतले विद्यार्थी
युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, "काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, "मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अ‍ॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो." युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha