भिवंडीत खड्ड्यामुळे डॉक्टरचा जागीच जीव गेला; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचा बळी, चूक कोणाची?
BHiwandi Accident: नागरिकांच्या रोषाला आता उधाण आले असून, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभागावर तीव्र टीका होत आहे.

Bhiwandi Accident : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड रस्ता आणि काँक्रीट व पेवर ब्लॉकमधील असमतोल गॅपमुळे दुचाकी घसरून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. मोहम्मद नशीम अन्सारी (वय 58) असे मृत डॉक्टरांचे नाव असून, आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला.
या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. भिवंडीत रस्त्याच्या कारणाने आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झालाय. यात नेमकी चूक कोणाची? असा सवाल नागरिक करतायत.
नेमके काय घडले ?
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटल जवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला . ढाब्यावर जेवण करून एक्टिवा वरून घरी परतत असताना एका डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे .
मध्यरात्री सिराज हॉस्पिटल समोरील रस्त्यावर त्यांची एक्टिवा दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून वंजारपट्टी नाका येथील एपीजे अब्दुल कलाम उडान पुलावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने अवजड वाहनांचे खालून वाहतूक सुरू होती . आणि दुचाकी घसरल्यामुळे थेट कंटेनरच्या चाकाखाली जाऊन डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी पोलीस पोहोचताच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. कंटेनर चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम वय 30 वर्ष याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
भिवंडीत खड्ड्यांमुळे 3 जणांचा मृत्यू
भिवंडी शहर व ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. याआधी दोन निरपराध जीवांनी प्राण गमावले, आणि आता एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे . प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेचा अंत कधी होणार? जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का? नागरिकांच्या रोषाला आता उधाण आले असून, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभागावर तीव्र टीका होत आहे. या घटनेने केवळ एक कुटुंबच उद्ध्वस्त झाले नाही, तर संपूर्ण भिवंडीकरांच्या मनात भीती आणि संताप निर्माण केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
हेही वाचा
Kolhapur News: कोल्हापुरातील दोन गटातील तुंबळ दगडफेकीत पीएसआयसह आठ जण जखमी; वादाची ठिणगी कशी पडली?
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















