सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर; कंगना रानौतचा बॉलिवूडवर गंभीर आरोप
सुशांतच्या कामाबद्दल त्याचं एवढं कौतुक झालं नाही, जेवढं व्हायला हवं होतं. एवढे चांगले सिनेमे करुन देखील त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दुसरीकडे 'गली बॉय'सारख्या फालतू सिनेमाला एवढे पुरस्कार मिळाले, असं परखड मत कंगना मांडलं.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतने काल आपल्या मुंबईतील घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील प्रस्थापितांविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कंगना रानौतने सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना बॉलिवूडवर निशाणा साधाला आहे. सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय असा गंभीर आरोप कंगनाने बॉलिवूडवर केला आहे. काही जण सुशांत कमकुवत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, तो मानसिकदृष्ट्या कमकुवत कसा असू शकतो? आत्महत्येआधी सुशांतची जी परिस्थिती होती, त्यासाठी बॉलिवूड जबाबदार आहे. सुशांतवर बोट दाखवणाऱ्या सर्वांचाच कंगनाने चांगलाच समाचार घेतला आहे.
सोशल मीडियावर व्हायरस होत असलेल्या व्हिडीओत कंगना म्हणते की, सुशांतने अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये म्हटलं होतं की, इंडस्ट्री मला स्वीकारत नाहीये. माझा कुणी गॉडफादर नाही, माझे सिनेमा बघा, नाहीतर मी या इंडिस्ट्रीतून बाहेर फेकला जाईन. सुशांतने अनेक चांगले सिनेमे केले होते. सुशांतच्या पहिल्या सिनेमाला (काय पो पे) फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी एवढं महत्त्व नाही दिलं. त्यानंतर 'एमस धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे' या सिनेमातील सुशांतच्या कामाबद्दल त्याचं एवढं कौतुक झालं नाही, जेवढं व्हायला हवं होतं. एवढे चांगले सिनेमे करुन देखील त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दुसरीकडे 'गली बॉय'सारख्या फालतू सिनेमाला एवढे पुरस्कार मिळाले.
पुढे कंगना म्हणाली की, सुशांतला या फिल्म इंडिस्ट्रीमधील लोकांनी त्याच्या सात वर्षाच्या कारकिर्दित एवढी इज्जत नाही दिली, जेवढा त्याचा हक्क होता. मला अनेक मेसेज येतात, तू देखील कठीण काळातून जात आहेत, चुकीचं पाऊल उचलू नकोस. मात्र अशा आशयाच्या मेसेजचा अर्थ नेमका काय काढायचा. का माझ्या डोक्यात आत्महत्येसारख्या गोष्टी टाकल्या जातात. यावेळी कंगनाने संजय दत्तचं उदाहरणं देऊन वाईट सवयींचीही कशी स्तुती केली जाते यावरही भाष्य केलं.
सुशांतची चूक ही होती की त्याने या लोकांचं म्हणणं ऐकलं. या लोकांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना हेच सिद्ध करायचं आहे की सुशांत मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. मात्र खरं काय आहे, हे इंडस्ट्रीतील मंडळी सांगणार नाहीत. मात्र आता आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की इतिहास कोण लिहिणार, असं कंगनाने म्हटलं.
संबंधित बातम्या
- Sushant Singh Rajput | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या
- नैराश्यात होता सुशांतसिंह राजपूत, प्राथमिक माहितीत उघड
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..






















