![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Narayan Rane : मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही, पण हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार? नारायण राणेंचा प्रश्न, पत्रकारांनाही केली दमदाटी
Narayan Rane Mahayuti Melava : महायुतीतील तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावं, उमेदवार कोण असावा याचा अजिबात विचार करू नका असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं.
![Narayan Rane : मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही, पण हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार? नारायण राणेंचा प्रश्न, पत्रकारांनाही केली दमदाटी narayan rane reaction on shankaracharya statement on pm narendra modi ayodhya ram mandir programme sindhudurg ratnagiri marathi news Narayan Rane : मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही, पण हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार? नारायण राणेंचा प्रश्न, पत्रकारांनाही केली दमदाटी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/20/fde93ba1bed25324637a9dda73f3502c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग: राम मंदिर मोदींनी उभं केलं, त्यांना शाबासकी द्यावी, हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नसल्याचं म्हटलं आहे. शंकराचार्य हे धर्मगुरू आहेत, त्यांनी मोदींना मार्गदर्शन करावं असंही ते म्हणाले. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या दरम्यान राणेंनी पत्रकारांनाही दमदाटी केल्याचा प्रकार घडला.
नारायण राणे म्हणाले की, "काल मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्गदर्शन करावं. राम मंदिर मोदींनी उभारलं, त्यांना शाबासकी द्यावी. हा कुठला प्रकार हे चुकतं, ते चुकतं? चुका मोठ्यांच्या काढणं चुकीचं. आमचे तुम्ही धर्मगुरू, तुमचा मान सन्मान, आदरातिथ्य करतो."
आम्ही वरून फोन केला तर सहन होणार नाही, पत्रकारांना दम
पत्रकारांना दम देताना नारायण राणे म्हणाले की, "पत्रकारांसाठी ब्रेकिंग न्यूजसाठी आम्ही केव्हा बोलत नाही. ब्रेकिंग न्यूज देताना आपण आपल्याच नेत्यांना डॅमेज करतोय याची जाणीव पत्रकारांनी ठेवावी. आम्ही पाकिस्तान दुबईतून आलेलो नाही. राणे, नितेश, केसरकर कसे बदनाम होतील हे पत्रकारांनी पाहू नका. पत्रकारांना वरून फोन येतो बातमी करता, आम्ही वरून फोन केला तर सहन होणार नाही. पत्रकार कारस्थानी नसावेत."
मी आज आहे, उद्या नसेल; नारायण राणेंचे भावनिक भाषण
नारायण राणेंनी यावेळी भावनिक भाषण देखील केलं. आज मी आहे, उद्या नसेन. मात्र या सर्वांना सभाळून घ्यावे असं ते म्हणाले. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्यात आपली सत्ता असून मागील 10 वर्षात प्रत्येक नागरिकांसाठी जे प्रयत्न केले, ते लोकांपर्यंत पोहचवा. 54 योजना केंद्राने राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळतोय. याची माहिती लोकांपर्यंत जाऊन पोहोचवा. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही जिंकू. उमेदवार कोण असेल याची चर्चा नको. 2030 मध्ये भारत महासत्ता बनून तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल असे मोदींनी सांगितले आहे. पण आता यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
बॅनर आता नको, तीन पक्षात मतभेद नको असं सांगत राणे म्हणाले की, "राणे बीजेपी नको, फक्त बीजेपी असू द्या. कोण टीका करतात, त्याला महत्व देऊ नका. मोदींनी हॅटट्रिक करावी हेच लक्ष. पुढील 5 वर्षात जिल्हा ओळखता येणार नाही असा विकास करू. शिवसेना कशी आहे? विचारधारा कशी आहे? मी 39 वर्षे शिवसेना जवळून पाहिली आहे. बाळासाहेबांचा सर्वात जास्त सहवास लाभला तो म्हणजे नारायण राणे. माझ्या नेत्यांना कोणी बोलले तर मी चालून घेत नाही. मी अधिकचं जीवन जगतोय. त्यामुळे घाबरत नाही. कोकणी माणसे बुद्धिजीवी आहेत. आमच्या विरोधकांवर संक्रात येऊ दे. तीन पक्षांनी मने जुळवा. आपला पराभव करणारा कोणी नाही, आपलेच लोक पराभव करतात."
महायुतीचा मेळावा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी महायुतीच्या वतीनं मेळाव्यांच आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे मनोमिलन व्हावे या अनुषंगाने महायुतीच्या वतीने कणकवलीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक केसरकर आणि नारायण राणे तब्बल बारा वर्षांनी राजकिय व्यासपीठावर आले. यावेळी दोघानाही उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच महायुतीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी एकजुटीने हेवेदावे विसरून काम करावे अशी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, मागील 10 वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आताच्या खासदाराला उचलून बाहेर टाका. देवरा कुटुंब गांधी कुटुंबाबरोबर 55 वर्षे होते, आता काय झाले की ते दुसऱ्या पक्षात गेले. तर भाजप पक्षात या अन्यथा आपल्या मतदारसंघात निधी मिळणार नाही असं पुन्हा वक्तव्य केले. आज निधी मिळत नसल्याने आमच्याकडे प्रवेश होत आहेत. तिन्ही पक्षांनी एकत्र यावे, वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील तो फिक्स असेल.
सर्व जागा जिंकू, आदिती तटकरेंचा विश्वास
अदिती तटकरे, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, महायुतीच्या आणि घटक पक्षांच्या मेळाव्याचे आयोजन राज्यात होतेय. या मेळाव्यात मोठी गर्दी आहे. आमदार नितेश राणे म्हणाले की, जागेचा अंदाज आला नाही. पण ज्यावेळी अंदाज येत नाही त्यावेळी आपण वरचढ असतो. सर्व धर्म समभाव हा मुद्दा घेऊन विकास साधायचा. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी या अटल सेतूचे स्वप्न पाहिले होते. पण स्वप्न पाहणे आणि ते सत्यात उतरविणे वेगळे. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणे महत्त्वाचे. महिला संघटनांनी महायुतीचा प्रसार करण्यावर भर द्या. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणे आवश्यक. अंगणवाडी सेविका, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे सरकार तत्पर आहे. अधिकाधिक खासदारांपेक्षा सर्वच्या सर्व 48 खासदार जिंकून आणू अशा पद्धतीचे मेळावे आयोजित होतील.
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आपल्या युतीला आता महायुती म्हणतो, यात आरपीआय सुद्धा यात समाविष्ट आहे. समन्वयक कसा असावा हे समोर उदाहरण आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो कारण आमच्या जिल्ह्याचा नियोजन निधी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी थांबवला. पाणबुडी प्रकल्प पुढे घेऊन गेले नाहीत. अजूनही त्या प्रकल्पाचा निधी पडून आहे. आम्ही भाजप सेना युती कायम असावी यासाठी आग्रही होतो, पण यांनी वेगळे केले. बाळासाहेबांचे विचार ते विसरले. महाराष्ट्राला स्वतःचा इतिहास आहे. ज्यावेळी तुम्ही सर्व पाहता की, आम्ही सर्व जण एकत्र स्टेज वर असतो. त्यावेळी 80 टक्के विजय निश्चित असतो. कोकणातील काजू पिकाला त्या मुख्यमंत्र्यांनी एक रुपया दिला नाही. आज शिंदे सरकारने काजूसाठी 1500 कोटी दिले. महिलांसाठी अनेक योजना असून त्यात सिंधुरत्न फायदेशीर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पुढील तीन महिन्यात जिल्ह्यात विकासकामे पूर्ण करू. मुंबईचा 25 वर्षात कायापालट झाला नाही, तो आम्ही करू.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)