फलटण : काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जण प्रवेश करत आहेत. आज रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. 


शरद पवार म्हणाले की, मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का असे कार्यकर्त्यांकडे बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात घबराट होती.  माझ्या आईची श्रद्धा राजाळे येथील मंदिरात होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


महाराष्ट्र उभा करण्यामध्ये फलटणकरांचं मोठं योगदान 


ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ झाली. त्यात फलटण अग्रेसर होते. हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले. कारण महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळावं याचा काँग्रेसचा ठराव फलटण इथल्या मनमोहन पॅलेस येथे झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये फलटणकरांचे योगदान मोठं हे कुणी विसरू शकत नाही. 


रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत काय म्हणाले शरद पवार? 


इथे एक जण दिसत नाहीये. परंतु त्यांची मानसिकता काय आहे हे धैर्यशील यांच्या निवडणुकीत मला कळालं. एक जण इतर दिसत नाही त्याची चिंता तुम्ही करू नका. असे वक्तव्य शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत केले. स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहीण आठवली, असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला.


महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी


बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे संबंध होते. पण बारामतीकरांनी बहिणीला पाठिंबा दिला. मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले.  



संपूर्ण देशात तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही


आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. आठ महिन्यात पुतळा कोसळला. साठ वर्ष होऊन गेली तरी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्याला काही झालं नाही. काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही. संपूर्ण देशात तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. 


आणखी वाचा 


Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल